लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पुणे डेस्क, ३१ डिसेंबर : टीईटी परीक्षा घोटाळ्याचं आता दिल्ली कनेक्शनही समोर आलं आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यात आणखीन दोन जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीतून पोलिसांनी आशुतोष शर्मा आणि रोहिणी अवंतिका यांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या निशीद गायकवाड याच्या चौकशीतून आशुतोष शर्मा आणि सहकार्याने पेपर पुरविल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानुसार पुणे पोलिसांचं पथक गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून होतं. शर्मा आणि अवंतिका यांच्या तपासातून साखळीतील आरोपीचा पोलीस शोध घेणार आहेत. यासोबतच तुकाराम सुपेच्या ड्रायव्हरलाही अटक करण्यात आली आहे. टीईटी घोटाळ्यात आतापर्यंत पोलिसांनी एकूण ३१ आरोपींना अटक केली आहे.
तुकाराम सुपेच्या ड्रायव्हरला अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे याला अटक करण्यात आली आहे. तुकाराम सुपे याच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्याचा ड्र्रायव्हर सुनील खंडू घोलप यालाही अटक कलेी आहे. सुनील घोलप याचा गुन्हात सहभाग असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते त्यानंतर २९ डिसेंबर रोजी त्याला अटक करण्यात आली.
एजंटही अटकेत
या परीक्षा घोटाळा प्रकरणात एजंट मनोज डोंगरे यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मनोज डोंगरे याला लातूर येथून चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशी नंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
दिल्ली कनेक्शन
पुणे पोलिसांच्या सायबर टीमने दिल्ली येथून आशुतोष शर्मा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्यासोबत आणखी एका आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दोघांचीही चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ३० डिसेंबर रोजी अटक केली.
हे देखील वाचा :
येत्या फेब्रुवारी महिन्यात ८ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन