लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बीड, दि. १८ डिसेंबर : बीड तालुक्यातील राजेवाडी येथे शुक्रवारी दि. १७ डिसेंबर रोजी शेतकरी बाबुराव बाबुराव महागोविंद (३३) यांनी विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर बाबुराव महागोविंद यांना दोन एकर कोरडवाहू शेतजमीन आहे. या शेतात ते कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद असे पारंपरिक पिकांची लागवड करतात. मागील वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातील पुरते उत्पन्न हाती आले नाही. परिणामी त्यांनी खासगी बॅंकेकडुन कर्ज घेतले. हे कर्ज फेडणे जिकीरीचे जात असल्यामुळे आणि कर्जबाजारीपणात गेलेल्या या शेतकऱ्याने टोकाचे पाउल उचलत विष प्राशन करून आत्महत्या केली.
मागील वर्षीच ज्ञानेश्वर यांचे वडील बाबुराव महागोविंद यांनी देखील कर्जबाजारीपणास कंटाळुन आत्महत्या केली होती. वडिलांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम तीन ते चार दिवसांपूर्वीच झाला आणि मुलगा ज्ञानेश्वर बाबुराव महागोविंद यांनी सुद्धा विष प्राशन करून आत्महत्या केल्याने राजेवाडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या घटनेने राजेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
हे देखील वाचा :
काळविटाची शिकार करून मांसाची मेजवानी करणाऱ्या चौघांना रंगेहाथ केली अटक; वनविभागाची धडक कारवाई