लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : केंद्र सरकारने इयत्ता पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा त्याच वर्गामध्ये बसविले जाणार असल्याबाबतचा शासन निर्णय काढला.
सदर दोन वर्गातील नापास विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलले जाणार नसून त्यांना पुन्हा त्याच कक्षात बसविले जाईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यानुसार जिल्ह्याचा शिक्षण विभाग कामात लागला असून अप्रगत विद्यार्थ्यांची माहिती केंद्र व तालुकास्तरावरून मागविली आहे. एखादा विद्यार्थी समोरच्या वर्गात जाण्यासाठीचे वेळोवेळी निश्चित करण्यात आलेले आवश्यक निकष पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी आणखी अभ्यास करून दोन महिन्यानंतर होणारी फेर परीक्षा घ्यावी. फेर परीक्षेतही तो विद्यार्थी नापास झाल्यास त्याला पाचवी किंवा आठवीच्या वर्गातच बसविण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याच्या शिक्षण आयुक्तालयाने संपूर्ण राज्यभरातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या अपग्रत विद्यार्थ्यांबाबतची माहिती जिल्हास्तरावरून मागितली आहे. जानेवारी अखेरपर्यंत ही माहिती आयुक्तालयाला १०० टक्के पोहोचणार आहे. विद्यार्थी पुन्हा त्याच वर्गात बसल्यानंतर वर्गशिक्षकांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्याला नेमके काय समजले नाही, हे विविध मूल्यांकनाद्वारे समजून घेऊन त्याला जादा शिकवावे. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला काढता येणार नाही, असे नवीन आदेशात नमूद केले आहे.
हे ही वाचा,