लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
यवतमाळ, दि. २५ एप्रिल: कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनासह प्रशासन प्रयत्नशिल असताना बेजबाबदार नागरिक या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे असाच एक संतापजनक प्रकार घडला आहे. येथील आयटीआय कॉलेजमध्ये असलेल्या कोविड केअर सेंटरमधून तब्बल २० कोरोनाबाधित रुग्णांनी पलायन केल्याचे समोर आले आहे. प्रशासनाच्या प्रयत्नाना अखेर यश आले आहे. पलायन केलेल्या लोकांचे समुपदेशन करण्यात आले. अखेर २० जणांना कोरोना सेंटर मध्ये परत आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या रुग्णांना पुन्हा दाखल केले आहे. कोरोना सेंटरवर आता पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून वरिष्ठ अधीकारी कोरोना सेंटरला भेट देऊन पाहणी करणार आहे.
कोरोना केअर सेंटरमधून पळून गेलेले हे रुग्ण आमडी नावाच्या एकाच गावातील रहिवासी आहे. या सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे होती. या कारणामुळे त्यांना घाटंजीच्या कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. लक्षणे सौम्य असल्याने या रुग्णांना फारसा त्रास नव्हता. प्रशासन कोरोनाचे कारण समोर करीत आपल्याला प्रशासन उगीच डांबवून ठेवत असल्याची तक्रार या रुग्णांनी केली. याच कारणाने या रुग्णांनी कोरोना सेंटरमधून पळ काढला. तब्बल २० रुग्णांनी पलायन केल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले. या रुग्णांमुळे कोरोना प्रादुर्भावाचा मोठा धोका होता. अखेर प्रशासनानी या लोकांना शोधून त्यांची समजूत काढल्यावर कोरोना सेंटरमध्ये पुन्हा दाखल केले. तेव्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.