लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : गेल्या तीन वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात फिरणारा हत्तींचा कळप मागील आठ दिवसांपासून सदर कळप कुराडी, काटलीच्या जंगलात होता.आता पुन्हा गडचिरोली जिल्हा मुख्यालयाजवळ पोहोचला आहे. सोमवार, ३ मार्च रोजी संध्याकाळपर्यंत हा कळप गडचिरोलीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या मसेली-विहीरगाव जंगलात होता. संध्याकाळी ३२ हत्तींचा हा कळप वाकडीवरून सेमाना मार्गे मुडझाच्या जंगलात पोहोचला.
सोमवारी पहाटेच्या सुमारास कळप थेट दिभना, जेप्रा मार्गे धानोरा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून थेट गुरवळाच्या जंगलात पोहोचला. दिवसभर या परिसरात थांबल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मुडझाच्या जंगलात पोहोचला. मुडझाच्या पुढे वैनगंगा नदी आहे. ऑक्टोबर महिन्यात कळप याच मार्गे चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचला होता. यावेळीही हत्तींनी हाच मार्ग निवडला असल्याने ते चंद्रपूर जिल्ह्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत.
रानटी हत्तींच्या हालचालींवर वनविभाग लक्ष ठेऊन आहे, कुठल्याही स्थितीत हत्तींशी छेडाछाड करु नये, असे आवाहन उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांनी केले आहे. रानटी हत्तींनी केलेल्या 3 नुकसानीची भरपाई वनविभाग देत आहे, त्यामुळे त्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी शेतातील तारेत विद्युत प्रवाह सोडण्यासारखे प्रकार कोणीही करु नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. हत्ती आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क करावा, अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे ते म्हणाले.
२०२४ मध्ये जिल्ह्यात रानटी हत्तींनी घेतले होते. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम कियरमध्ये एक, हिदूर जंगलात दोन शेतकऱ्यांचा बळी गेला होता. याशिवाय गडचिरोली तालुक्यात एका शेतकऱ्याला प्राण गमवावे लागले होते. या पार्श्वभूमीवर रानटी हत्तींचा तत्काळ बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांची या संकटातून सुटका करावी, अशी मागणी होत आहे.