रानटी हत्तींचा कळप वन विभागाच्या ‘लोकेशन’च्या बाहेर

देलोडा परिसरातील लोकामध्ये भीतीचे वातावरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : रानटी हत्तींचा  कळप देलोडा जंगल परिसरातच वावरत आहे. कळपात चिमुकल्या नवीन सदस्याची एन्ट्री झाल्यापासून कळपाची चाल मंदावली आहे. जंगलालगत असलेल्या धान पिकाची नासधूस कळप करीत असल्याने ऐन कापणीला आलेले व जमा केलेले धान पिकाचे पुंजणे हत्ती पायदळी तुडवीत आहेत. या भागातील शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान रानटी हत्तींनी केलेले आहे. त्यामुळे शेतकरी  हवालदिल झाला असतानाही  वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हत्तींवर योग्य वेळी नियंत्रण करणे व शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात पोर्ला वन परिक्षेत्र कमी पडलेले आहे.

त्यातच रविवारी हत्तींचे ऑनलाइन लोकेशन वन कर्मचाऱ्यांना सापडत नव्हते. रानटी हत्तींच्या कळपाचा वावर महिनाभरापासून पोर्ला वन परिक्षेत्रात आहे. स्थानिक स्तरावर वनरक्षक हे जोमाने काम करीत असले तरी क्षेत्रसहायक तसेच वरिष्ट अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.  चुरचुरा उपक्षेत्रातील शेतकरी  नुकसान भरपाईपासून वंचित आहे. वर्षभरापूर्वी चुरचुरा उपक्षेत्रात वन जमिनीवर अतिक्रमण करून झाडांची अवैध तोड करण्यात आलेली होती. तेव्हापासूनच सदर उपक्षेत्र चर्चेत आले आहे. आतासुद्धा या उपक्षेत्रात झाडांची तोड केली जात आहे.

शेतकऱ्यांच्या धान पिकाची हत्तींकडून नासधूस केली जात असतानाही क्षेत्रसहायक व वनरक्षकाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. महिनाभराचा कालावधी उलटूनही चुरचुरा उपक्षेत्रातील झालेल्या पीक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही. एका महिन्यात पीक नुकसानीची भरपाई न मिळाल्यास संबंधित शेतकऱ्याला व्याजासह भरपाई द्यावी, असा शासन निर्णय आहे;  वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने पोर्ला वन परिक्षेत्रातील अधिकारी कर्तव्यात हयगय करीत असल्याचे दिसून येत आहे. परंतु याबाबत तक्रारी होत नसल्याने वनाधिकाऱ्यांचे फावले आहे.

रानटी हत्तींची देखरेख करणारी व त्यांच्यावर नियंत्रणासाठी नेमलेली पश्चिम बंगालमधील हुल्ला टीम सध्या कुचकामी ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याकडे वडसा वन विभागाच्या उपवनसंरक्षकांचेही दुर्लक्ष होत आहे. त्यांचे  कनिष्ठ कर्मचारी यांचेवर नियंत्रण  नसल्याचे दिसून येत आहे.