विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत ग्राहकांची वीजजोडणी तोडू नये

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

वाढीव वीजबिलावरुन राज्यभरात भाजपनं आंदोलन केल्यानंतर आज विधिमंडळात देखील ते आक्रमक झाले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, 2 मार्च :- वाढीव वीजबिलावरुन राज्यभरात भाजपनं आंदोलन केल्यानंतर आज विधिमंडळात देखील ते आक्रमक झाले. शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या विधीमंडळातील निर्देशानंतर संबंधीत यंत्रणांना वीजतोडणी तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आले आहे.

विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत थकबाकीसंदर्भात उपस्थित मुद्याला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वीजबिलांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. चर्चा होऊन दोन्ही बाजूंच्या सभासदांचे समाधान होईपर्यंत राज्यातील कृषीपंप आणि ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात येणार नाही. राज्यातील वीज थकबाकीसंदर्भात विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्देशाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

ajit pawarelectricity billno line cut