आलापल्लीत बाबासाहेबांची १३५ वी जयंती विचारांनी उजळली; ‘ज्ञानाशिवाय विकास अशक्य’चा ठाम संदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली : विचार, कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवणाऱ्या उपक्रमांतून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आलापल्ली येथे उत्साहातच नव्हे, तर प्रगल्भतेने साजरी करण्यात आली. यंदा केवळ पारंपरिक मिरवणुकीपुरते कार्यक्रम मर्यादित न ठेवता, समाजप्रबोधनाचा ठोस संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांनी जयंतीला वेगळी उंची मिळवून दिली.

मुख्य चौकात उभारण्यात आलेल्या मोफत पुस्तक वितरण उपक्रमाने या सोहळ्याचे केंद्रस्थान मिळवले. ज्ञानाच्या प्रसारातून समाज परिवर्तनाची दिशा दाखवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून आला. सामाजिक कार्यकर्ते उमाजी गोवर्धन, प्रवीण फुलझेले आणि जीवन पुसाटे यांनी स्वखर्चातून या कार्यक्रमाचे आयोजन करत समाजासमोर आदर्श निर्माण केला. नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत या उपक्रमाला उत्साहाने प्रतिसाद दिला.

सायंकाळी चार वाजता भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्घाटन भारतीय वनअधिकारी मोहम्मद आजाद यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थान महाराष्ट्र वनाधिकारी दीपक रामटेके यांनी भूषविले. अज्जू पठाण, हंसराज राऊत आणि दादाजी फुलझेले यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.

या प्रसंगी बोलताना उमाजी गोवर्धन यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा गाभा अधोरेखित करत, “मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञान संपादन हाच एकमेव मार्ग आहे, हे बाबासाहेबांनी आपल्या जीवनातून सिद्ध करून दाखवले,” असे प्रतिपादन केले. “शिका, शिकवा, संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करा” हा संदेश आजही तितकाच सुसंगत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनाचा आणि त्यांच्या विचारांचा आजच्या सामाजिक वास्तवाशी संबंध जोडत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश चालुरकर व राहुल मेश्राम यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रवीण फुलझेले यांनी मानले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतीक तावाडे, रज्जाक पठाण, गणपत कांबळे, गणपत ब्रह्मटेके आणि पृथ्वीराज गेडाम यांचे विशेष योगदान लाभले.

Comments (0)
Add Comment