भारत जोडो यात्रेचा अनुभव अविस्मरणीय:अशोक चव्हाण

राहुलजी गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा आता जनयात्रा झाली!: नाना पटोले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नांदेड, 14 नोव्हेंबर :- राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पदयात्रेला दररोज प्रचंड पाठिंबा मिळत आहे. ही पदयात्रा केवळ काँग्रेस पक्षाची नसून लोकशाही व संविधान वाचले पाहिजे अशी भावना असलेल्या प्रत्येकाची आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणानंतर महाराष्ट्रात जनतेचा या पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद प्रचंड असून भारत जोडो यात्रा आता ‘जनयात्रा’ झाली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, महागाई, बेरोजगारी, पट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले दर, जीएसटी, चीनने भारताच्या हद्दीत केलेले अतिक्रमण या देशातील ज्वलंत समस्यांवर केंद्रातील मोदी सरकार गप्प आहे.जनतेच्या समस्या सोडवण्याकडे या सरकारचे लक्ष नसून इतर मुद्दे चर्चेत आणले जात आहे. भाजपा सरकारच्या या नाकर्तेपणावर जनतेमध्ये तीव्र संताप आहे तो संताप, त्यांच्या तीव्र भावना हे लोक भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन राहुलजी गांधी यांच्याशी व्यक्त करत आहेत. भाजपा सरकारवर जनतेचा प्रचंड रोष असल्याचे या पदयात्रेच्या माध्यमातून समजत आहे. या लोकभावनाच आता भाजपा सरकारला सत्तेतून बाहेर करतील.

भारत जोडो यात्रा निघाल्यापासून भाजपाचे नेते टीका करत आहेत पण या पदयात्रेला मोठे जनसमर्थन देऊन जनताच भाजपाला चोख उत्तर देत आहे. भाजपाच्या टीकेची काँग्रेस पर्वा करत नाही, त्यांच्या टीकेचा पदयात्रेवर काहीही परिणाम होत नाही उलट जनतेचा दररोज पाठिंबा वाढतच आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेचे समर्थन केले आहे पण भाजपाच्या काही लोकांचा भारत जोडो यात्रेला मिळणारे समर्थन पाहून जळफळाट होत आहे.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, भारत जोडो यात्रेसाठी प्रदेश काँग्रेसह नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीने चोख व्यवस्था करून जिल्ह्यात यात्रा यशस्वीपणे पार पाडली. याआधीही आम्ही काँग्रेस पक्षासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले पण भारत जोडो यात्रेचा अनुभव वेगळाच होता. एवढी मोठी यात्रा व त्याला मिळालेला जनतेचा पाठिंबा अपेक्षेपेक्षाही जास्त होता. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील ही पदयात्रा माझ्यासह अनेकांसाठी एक अविस्मरणीय क्षण आहे.

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, AICC च्या माध्यम विभागाच्या महिमा सिंह, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे व सोशल मीडियाचे विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.

हे पण वाचा :-

Bharat Jodo Yatrarahul gandhi