मुंबई पाणीपट्टी दरवाढीला भाजपाचा विरोध

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 6 जून- मुंबईला राज्य शासनाच्या कोट्यातील अतिरिक्त पाणी साठा देण्याचे मान्य केल्याबद्दल शिंदे- फडणवीस सरकारचे आभार मानून मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी पालिकेने प्रस्तावित केलेल्या पाणीपट्टी दरवाढीला भाजपाचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये ४ जून २०२३ पर्यंत फक्त ११.७६ टक्के म्हणजे १ लाख ७४ हजार दशलक्ष लिटर जलसाठा शिल्लक आहे.

पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यास मुंबईला अतिरिक्त पाण्याची गरज भासू शकते. म्हणून राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा व भातसा धरणातून राखीव पाणीसाठा मिळावा, अशी मागणी पालिकेने सरकारकडे केली होती. तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांना वर्षभरात सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. ४ जून रोजी सातही धरणांत १ लाख ७४ हजार ९३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. राखीवसाठ्यावर मदार भातसा धरणातून ७५ हजार दशलक्ष पालिकेला मिळावी अशी मागणी होती.

याबाबत आज पालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याशी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज चर्चा केली. त्यावेळी आयुक्तांनी सांगितले की, राज्य शासनाने आपला अतिरिक्त पाणी साठा देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे याबाबत माध्यमांशी बोलताना आ. ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने १६ जूनपासून पाणीपट्टी दरामध्ये वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. लिटरमागे २५ पैसे ते चार रुपयांपर्यंत ही वाढ प्रस्तावित आहे. आमचा या दरवाढीला तीव्र विरोध आहे, असेही आ. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. एकाबाजूला मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देऊन एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला पाणीपट्टी वाढवून दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे हे चालणार नाही. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की, त्यांनी ही पाणीपट्टी वाढ होण्यापासून रोखावी, असेही ते म्हणाले.

हे पण वाचा :-