लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
देसाईगंज : जिल्ह्यातील पहिली नगर परिषद म्हणून ओळख असलेल्या देसाईगंज नगर परिषदेवर भाजपने पुन्हा एकदा आपली सत्ता अबाधित राखत राजकीय सातत्य अधोरेखित केले आहे. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपच्या लता मुरलीधर सुंदरकर यांनी काँग्रेसच्या वनिता अशोक नाकतोडे यांचा अवघ्या ६१६ मतांनी पराभव करत निर्णायक विजय मिळवला. हा विजय संख्येने निसटता असला, तरी त्यामागचा राजकीय अर्थ मात्र मोठा मानला जात आहे.
२१ सदस्यीय नगर परिषदेत भाजपचे १२ नगरसेवक निवडून येत पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. काँग्रेसला ७, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला २ जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान देसाईगंजात काँग्रेसबहुल वातावरण निर्माण झाले असतानाही शहराने नगर परिषद निवडणुकीत पुन्हा भाजपलाच कौल दिला, ही बाब राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरते.
या निकालामुळे काँग्रेसचे विद्यमान आमदार रामदास मसराम यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजल्याचे चित्र आहे. त्यांच्या मतदारसंघातील देसाईगंज आणि आरमोरी या दोन्ही नगर परिषदांमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागणे हा केवळ स्थानिक अपयश नसून, भविष्यातील राजकीय आव्हानांचा ‘रेड सिग्नल’ मानला जात आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत नागरिकांचा कौल भाजपच्या बाजूने वळवण्यात पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने संघटनात्मक ताकद पणाला लावली. माजी आमदार कृष्णा गजबे, भाजप नेते किशन नागदेवे, मोतीलाल कुकरेजा, व्यापारी आघाडीचे आकाश अग्रवाल यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली रणनीतीपूर्ण तयारी, योग्य उमेदवारांची निवड आणि सातत्यपूर्ण संपर्क यामुळेच हे यश शक्य झाल्याचे बोलले जात आहे.
देसाईगंजचा हा निकाल केवळ नगराध्यक्षपदापुरता मर्यादित न राहता, शहरातील मतदारांचा राजकीय कल आणि आगामी निवडणुकांतील शक्यता स्पष्ट करणारा ठरतो. सत्ता बदलाच्या चर्चा सुरू असतानाच भाजपने आपले स्थान कायम राखत देसाईगंजच्या राजकारणात पुन्हा एकदा आपली पकड मजबूत केली आहे.