लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली : अल्लापल्ली शहरातून एटापल्ली च्या दिशेने जाणाऱ्या नागपूर–एटापल्ली बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेकडून वन्य जीवाचे मास सापडल्याने वनविभागाने कारवाई केली. मात्र पंचनामा करूनही महिलेला अटक न करता सोडल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
बुधवारी रात्री आलापल्लीजवळ एका वन कर्मचाऱ्याला संशयास्पद वास आल्याने वन कर्मचाऱ्याला माहिती देऊन आलेल्या दोन वनकर्मचाऱ्यांनी बस अडवली. झडती दरम्यान सीटखाली चितळाचे मास आढळले. वनकर्मचाऱ्यांनी पंचनामा करून मास जप्त केले, मात्र महिलेला वयोमानाचा विचार सांगत सोडण्यात आले.
या कारवाईदरम्यान एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. इतक्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांना न कळवणे आणि महिला वनरक्षकांकडून सहाय्य न घेणे — या दोन्ही गोष्टींवर प्रशासनाचे मौनच जास्त बोलके ठरले आहे.
वन्यजीव संवर्धनाच्या कायद्यात चितळ मांसासंबंधी गुन्हा संज्ञेय असून, तडजोडीचा प्रश्नच नाही. तरीही तपास पुढे न गेल्याने हा प्रकार विभागाच्या जबाबदारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो.
वन्यजीवाचे मास जप्त झाले, आरोपी मुक्त झाली — मग कायद्याचा अर्थ कोणासाठी? असा सवाल नागरिक आणि पर्यावरणप्रेमी आता थेट वनविभागालाच विचारत आहेत.