मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई डेस्क, दि. १० नोव्हेंबर : एसटी महामंडळाच राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. कर्मचारी संपावर ठाम असल्याने एसटी बस वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या आंदोलक कर्मचाऱ्यांना उद्देशून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे.

या आवाहनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे.

अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.

राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या.

हे देखील वाचा :

संप करणाऱ्या एस. टी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा, राज्यातील तब्बल ३७६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई… 

एस.टी. कर्मचारी संपाविरोधात महामंडळ आज हायकोर्टात अवमान याचिका दाखल करणार तर दुसरीकडे एस.टी. कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा

मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

 

 

Anil ParabCM Uddhav ThackareyGopichand Padalkarlead newsMSRTC