लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य समस्यांमध्ये दीर्घकाळ डोकेदुखी ठरलेल्या मलेरियाविरुद्ध आता निर्णायक लढा उभारण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ग्लोबल फंडच्या सहकार्याने टीसीआय फाउंडेशनमार्फत ‘इंटेन्सिफाईड मलेरिया इलिमिनेशन प्रोग्रॅम (IMEP-3)’ या व्यापक मोहिमेला सुरुवात झाली आहे.
या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात तपासणी, त्वरित उपचार आणि देखरेखीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच जनजागृती आणि प्रभावी डास नियंत्रणाच्या उपाययोजना राबविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. गडचिरोलीत मलेरियामुक्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्पेशल टास्क फोर्स कार्यरत असून, ठोस नियोजन, काटेकोर अंमलबजावणी आणि टीसीआय फाउंडेशनच्या सहकार्याने हा जिल्हा लवकरच मलेरियामुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत भारत पूर्णतः मलेरियामुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राने ठोस पावले उचलली असून, “मलेरियामुक्त महाराष्ट्र” हे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य सरकार संपूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या ग्लोबल फंडने २०२१–२०२४ (GC6) आणि २०२४–२०२७ (GC7) या कालावधीत टीसीआय फाउंडेशनची प्रमुख प्राप्तकर्ता (Principal Recipient) म्हणून निवड केली आहे. देशभरातील मलेरिया निर्मूलन उपक्रमांसाठी ही संस्था राष्ट्रीय वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल सेंटर (NCVBDC), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या तांत्रिक भागीदारीत कार्यरत आहे.
या मोहिमेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागासह ग्रामीण जनतेला मोठा दिलासा मिळणार असून, आरोग्य क्षेत्रात हा उपक्रम नवजीवन देणारा टप्पा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.