मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार: मुंबई कॉंग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांचे सुतोवाच

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुंबई:२० डिसेंबर

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही महाविकास आघाडीनं भाजपला जोरदार धक्का दिलाय. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, असा दावा केला जातोय. अशावेळी  मुंबई कॉंग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप  यांनी काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केलीय.  

काँग्रेस हायकमांडकडून शनिवारी भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आज भाईंनी मोठं वक्तव्य केलंय. मुंबईत काँग्रेस विरोधी पक्षात आहे. त्यामुळे इतर सगळ्यांना विरोध राहील, अशी घोषणाच जगताप यांनी केली आहे. मुंबईत कॅप्टन म्हणून बदल निश्चित करुन दाखवणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. माझ्या साथीला अनुभवी आणि चांगली टीम दिली आहे. नाराज नेत्यांना सोबत घेऊन काम करणार. सगळ्यांना बरोबर घेऊन काम करेन. कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम करेन, असंही भाई जगताप म्हणाले.

दुसरीकडे काँग्रेसचेच नेते नसीम खान यांनी मुंबई महापालिकेचा सर्व 227 जागांवर आम्ही निवडणूक लढणार असल्याचं म्हटलंय. येत्या काळात काँग्रेस विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढेल. गेल्या अनेक काळापासून शिवसेना आणि भाजपकडे महापालिकेची सत्ता होती. त्यामुळे रखडलेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणारच, असंही नसीम खान म्हणाले.

राज्य सरकारमध्ये काँग्रेसच्या आमदारांचे प्रश्न मार्गी लागत नाही. त्यांना निधी मिळत नाही, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळेच सोनिया गांधींना हस्तक्षेप करावा लागल्याचंही खान म्हणाले. मी काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे. मला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, असंही खान यांनी सांगितलं.

bhai jagtapbmcmumbai congress