लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली: गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती आणि सर्वात मोठ्या गावांपैकी एक असलेल्या आलापल्ली शहरातील भामरागड रोडलगत असलेल्या ऐतिहासिक मामा तलावाच्या खोलीकरण व सौंदर्यीकरणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके यांना विशेष निवेदन सादर केले.
अल्लापल्ली शहरात पाण्याच्या पातळी वाढीला हातभार लावणारा तलाव.
मामा तलावाचे खोलीकरण झाल्यास गावातील भूगर्भ जलपातळी वाढण्यास मोठी मदत होईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या आलापल्ली शहरात कोणतीही बाग किंवा सार्वजनिक उद्यान उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना सकाळी फिरण्यासाठी किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी योग्य जागा उपलब्ध होत नाही. तलावाच्या सौंदर्यीकरणामुळे ही दोन्ही समस्या दूर होऊ शकते.
तलावावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी जोर धरू लागली
गेल्या अनेक वर्षांपासून मामा तलाव परिसरात अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे. हे अतिक्रमण तातडीने हटवून तलावाचे पुनर्जीवन करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली. याचबरोबर, तलावाच्या मध्यभागी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य प्रतिमा उभारावी व संपूर्ण परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करावा, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
मामा तलावाभोवती पुर परिस्थिती टाळण्यासाठी संरक्षण भिंतीची आवश्यकता
दरवर्षी पावसाळ्यात तलावाचे पाणी शहरात शिरते आणि पुर परिस्थिती उद्भवते. ही समस्या टाळण्यासाठी तलावाभोवती भक्कम संरक्षण भिंत उभारावी व पावसाळ्यापूर्वी तलावाचे खोलीकरण तातडीने पूर्ण करावे, अशीही विनंती करण्यात आली.
आदिवासी विकास मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
भाजपा पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके यांना त्यांच्या आलापल्ली दौऱ्यात हे निवेदन दिले. यावर मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “या मागण्यांवर लवकरच निर्णय घेऊन मामा तलावाचा विकास करून आलापल्लीला एक पर्यटन स्थळ म्हणून उभारण्यात येईल,” असे आश्वासन दिले.