लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्ग, दि. १५ एप्रिल: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत्या प्रमाणात आढळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जाहीर झालेल्या पंधरा दिवसाच्या संचारबंदीला अनुसरून जिल्ह्यात याची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी यांनी जिल्हावासीयांना संचारबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व सीमांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशन वर आरोग्य पथके येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी नेमली आहेत. एसटी विभागाने आपली सेवा मर्यादित प्रमाणात सुरू ठेवली आहे. बाजारपेठांमध्ये भाजीवाले, फळ विक्रेते, किराणा दुकान, बेकरी व्यवसाय सुरू ठेवण्यात आलेले आहेत. मात्र बाजारपेठांमध्ये संचारबंदीची अंमलबजावणी सुरू असल्यामुळे ग्राहक अभावानेच दिसत आहे. दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.