लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
जालना, 29 एप्रिल : जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री परीसरात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. परिसरातील विविध ठिकाणी वीज कोसळून ३ म्हशी,२ बैल तर ३ गाई अशी ८ जनावरे दगावली आहेत तर बारसवाडा येथील शेतमजूर जखमी झाला आहे.किरण शेषराव वाकडे यांच्या गट नंबर १३३ मध्ये सालगडी श्रीरंग राठोड हे बैलं चारत होते. विजा चमकत असल्याने ते बैल गाडी खाली बसले.त्याच वेळी वीज कोसळली आणि एक बैल दगावला,तर अगदी जवळच असलेले श्रीरंग राठोड हे विजेच्या धक्क्याने जखमी झाले. वडीगोद्री परीसरात आज वीज कोसळून ८ जनावरे दगावली आहेत.
जालना जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून अवकाळी पावसाने कहर केला आहे.त्यामुळे शेती मालासह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे तर सोसाट्याच्या वाऱ्याने कित्येक घरांवरील पत्रे उडून गेली आहेत.यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला आहे.जालना जिल्ह्यातील जालना अंबड, घनसावंगी, मंठा, परतुर, जाफराबाद, भोकरदन बदनापूर तालुक्यात चार दिवसांत प्रचंड गारपीट, वादळाचा तडाका यामुळे लाखोंचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत.आज २८ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील विविध भागात विजा कोसळून तब्बल ११ जनावरे दगावली आहेत. तर काही ठिकाणी मोसंबीच्या बागा पडल्या आहेत.आंब्याचे तर पुर्णतः नुकसान झाले आहे. आज दिवसभरात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि ठिकाणी गारांचा पाऊस झाला. अनेक ठिकाणी मोठ-मोठी झाडे उन्मळून पडली आहेत काही ठिकाणी लग्न समारंभातील मंडप उडून गेले आहेत. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर आले आहेत. पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी शेतातून पाणी वाहत होते. तर काही रस्त्यावरील झाडे उन्मळून पडल्याने वाहतुक खोळंबली होती.
कुलाबा येथील हवामान शास्त्र विभागाच्या सूचनेनूसार आज शुक्रवारी 28 एप्रिल रोजी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता.त्यानूसार आज दुपारनंतर जालना शहरासह बदनापूर, भोकरदन, अंबड जाफ्राबाद, घनसावंगी, मंठा, परतूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अंबड तालुक्यातील वडीगोद्री परीसरासह भोकरदन तालुक्यातील धावडा परीसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला असून आज ठिकठिकाणी विजा कोसळून अकरा जनावरे दगावल्याची घटना घडली. याशिवाय पिकेही उद्ध्वस्त झाली.विज कोसळल्याने पशुपालकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.सोबतच वाराही वेगाने वाहात असल्याने मोसंबी, डाळींब, आंबे गळून पडले आहेत. तर काही ठिकाणी मोसंबीचे झाडे उन्मळून पडली आहेत.
हे देखील वाचा-