धान खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांना होणार फायदा : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ.

पेठ तालुक्यातील करंजळी येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नाशिक डेस्क  21 नोव्हें :- आधारभूत हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदीचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. शेतकऱ्यांना या केंद्राजवळ लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.

पेठ तालुक्यातील करंजळी येथे आधारभूत हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ बोलत होते. शेतकरी शेतात अन्न धान्य पिकवतो, त्या शेतमालाला मिळणाऱ्या भावाला चढ उतार असतात; परिणामी शेतकऱ्याचे नुकसान देखील होण्याची शक्यता असते. मात्र, आधारभूत हमीभावामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव तर मिळणारच आहे; पण त्यासोबत शेतमालाची विक्री करून मिळणारे पैसे संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे.

महामंडळ आधारभूत हमीभावापेक्षा कमी दराने धान खरेदी करणार नाही तसेच शेतकऱ्यांनीही इतर व्यापाऱ्यांना विक्री करताना हमीभावपेक्षा कमी दराने विकू नये; म्हणजे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असताना आदिवासी विकास महामंडळाला पुन्हा ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भात गिरण्यांचा प्रश्न नेहमीच उपस्थित होत आहे. त्यासाठी सहकार विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, पेठ तालुक्यातील सहकारी सोसायट्या तसेच या संबंधित असलेल्या संस्था यांसोबत चर्चा करून वरिष्ठ स्तरावर निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.

कोरोनामुळे विकासकामांची गती कमी झाली; मात्र राज्य शासन आता हळूहळू सर्वच स्तरावर विकासकामे सुरू करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जरी झालेला असला तरी देखील पूर्णतः नायनाट झालेला नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा प्रशासन यंत्रणा त्यादृष्टीने पूर्णतः तयारीत असल्याचेही श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक तथा आमदार सुनील भुसारा यांनी यावेळी बोलताना सांगितले की, धान खरेदी केंद्राच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मूलभूत सोयी सुविधा देण्यात येणार आहे. वेळेत शेतमालाचे मोजमाप होऊन शेतकऱ्यांना त्या मालाचे पैसे मिळणार आहे. राज्य शासनाने देखील आता विकासकामे सुरू केलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कसोशीने प्रयत्न केले आहेत. खावटी योजना देखील लवकरच सुरू होणार असून ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये, असे आवाहन आमदार श्री. भुसारा यांनी यावेळी केले.