वन्हाड्यांच्या वाहनाला अपघात; निम्मलगुडमजवळ झाडावर आदळून चार जण गंभीर जखमी

निमलगुडम गावाजवळील अपघाताने लग्नसोहळ्याच्या आनंदावर विरजण..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ओमप्रकाश चुनारकर,

आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दीड वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी उखडलेला पृष्ठभाग, सैल गिट्टी, अर्धवट काम आणि निकृष्ट दर्जाच्या मुरुमामुळे हा मार्ग जीवघेणा बनला आहे. नागरिकांनी वेळोवेळी याविरोधात तक्रारी आणि आंदोलने केली असूनही प्रशासनाने अद्यापही याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहनांचे टायर पंचर होणे, घसरणे यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अहेरी : अल्लापल्लीहून तेलंगणाकडे लग्नाच्या आनंदात निघालेल्या वऱ्हाड्यांच्या उत्साहावर अपघाताच्या सावटाने विरजण घातले. शुक्रवारी (१६ मे) सकाळी सुमारास आलापल्ली–सिरोंचा मार्गावरील निमलगुडम गावाजवळ वऱ्हाड घेऊन जाणारे चारचाकी वाहन झाडावर आदळल्याने चार जण जखमी झाले आहेत.

आलापल्लीतील मद्देलवार कुटुंबातील एका तरुणाचे लग्न तेलंगणा राज्यात ठरले होते. त्यामुळे सकाळी लवकर खासगी वाहनाने निघालेल्या वऱ्हाड्यांचे वाहन आलापल्लीपासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या निमलगुडम गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळले.

या अपघातात नवरदेवाचे वडील, मामा, बहीण, भाची व चालक प्रफुल्ल येरणे हे जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने आलापल्ली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चालकाला अधिक उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे. वाहनाचा समोरचा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून सुदैवाने जीवितहानी टळली.

दरम्यान, या अपघातानंतर महामार्गाच्या कामातील ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दीड वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी उखडलेला पृष्ठभाग, सैल गिट्टी, अर्धवट काम आणि निकृष्ट दर्जाच्या मुरुमामुळे हा मार्ग जीवघेणा बनला आहे.

नागरिकांनी वेळोवेळी याविरोधात तक्रारी आणि आंदोलने केली असूनही प्रशासनाने अद्यापही याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहनांचे टायर पंचर होणे, घसरणे यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली असून रस्त्यांवर पाणी साचणे, मुरुम वाहून जाणे यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. अशा वेळी कंत्राटदाराने आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने नागरिकांत तीव्र संताप निर्माण झाला आहे.

हा अपघात प्रशासनाच्या उदासीनतेचा आणि कंत्राटदारांच्या बेजबाबदारपणाचा गंभीर परिणाम असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन रस्त्याचे काम दर्जेदार आणि सुरक्षित करण्याची मागणीही यानिमित्ताने पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.