धक्कादायक: आरटीपीसीआर तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅॅब नमुन्यांंमध्ये आढळली बुरशी

३१० नमुन्यांपैकी २०० नमुने प्रयोगशाळेत अधिकाऱ्यांनी स्वीकारले उर्वरित ११० नमुन्यामध्ये बुरशी तयार झाल्यामुळे हे नमुने अधिकाऱ्यांनी स्वीकारण्यास नकार देऊन परत केल्याने वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आरोग्य विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वाशीम, दि. ३ मार्च: मालेगाव तालुक्यातील जऊळका आणि शिरपूर जैन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरटीपीसीआरच्या चाचणीसाठी घेण्यात आलेले घशातील स्त्रावाचे नमुने उघड्यावरच जास्त दिवस पडून राहिले परिणामी या नमुन्यामध्ये बुरशी तयार झाल्याचा धक्कादायक प्रकार 1 मार्च रोजी उघडकीस आला. परिणामी वाशिम येथील प्रयोगशाळेने बुरशी आलेले ११० नमुने परत केल्यामुळे मालेगाव तालुक्यातील आरोग्य विभागाचा गलथान कारभार यानिमित्ताने उघडकीस आला आहे. ज्या ११० लोकांचे नमुने बुरशीमुळे परत करण्यात आले त्या ११० लोकांना परत बोलावून त्यांचे नमुने घेण्याची मोठी जबाबदारी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना पार पाडावी लागणार आहे.

मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन आणि जऊळका प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २४ फेब्रुवारी पासून घेतलेले नमुने आणि मालेगाव मधील स्त्रावाचे असे एकूण ३१० नमुने घेऊन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी संतोष घुले हे १ मार्च रोजी वाशीम येथील कोविड प्रयोगशाळेमध्ये सायंकाळी ५ वाजता घेऊन आले. या ३१० नमुन्यांपैकी २०० नमुने प्रयोगशाळेत अधिकाऱ्यांनी स्वीकारले उर्वरित ११० नमुन्यामध्ये बुरशी तयार झाल्यामुळे हे नमुने अधिकाऱ्यांनी स्वीकारण्यास नकार देऊन घुले यांना परत केले. परत केलेले नमुने घुले यांनी मालेगावच्या  तालुका अधिकारी कार्यालयामध्ये रीतसर पाठवून दिले. ज्या ११० नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाली ते नमुने चार दिवस आधीच होते असे संबंधितांकडून सांगण्यात येत आहे. 

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनाची चाचणी करण्यासाठी घेण्यात आलेले घशातील स्त्रावाचे नमुने हे दोन ते आठ सेंटीग्रेड तापमानात ठेवावे लागतात हे नमुने त्याच दिवशी सायंकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत प्रयोगशाळेमध्ये पोहोचते करणे आवश्यक आहे परंतु या सर्व नियमांची अशीच काहीशी करून आरोग्याधिकारी जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार समोर येत आहे.

दोषींवर कोणती कारवाई होणार?

११० स्राव नमुन्यांमध्ये तयार झालेली बुरशी ही त्यांच्या चुकीमुळे झाली. त्यांच्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी काय कारवाई करतात याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे. अतिशय संवेदनशील असलेल्या कोरोना महामारीला आटोक्यात आणण्याची जबाबदारी त्यांचेवर दिलेली आहे. त्याच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा या घटनांमधून अधोरेखित झाला. साधे मास्क लावले नसले तर एकीकडे शिक्षा होते.  हा प्रकार तर मास्क पेक्षाही गंभीर स्वरूपाचा निश्चितच आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी या घटनेतील दोषींवर कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

मालेगाव येथील घडलेला प्रकार हा अतिशय गंभीर आहे हा प्रकार नेमका कसा घडला याची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना समज देण्यात येईल. यानंतर अशी चूक होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितले जाईल. यापुढे आरटीपीसीआर चे नमुने संकलित करण्याची विशेष व्यवस्था होईल. – डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

RTPCR