शासकीय शाळा स्मार्ट करण्यासाठी शासन कटिबद्ध – सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल

जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात १२ शिक्षक व २ केंद्रप्रमुखांचा सत्कार....

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : राज्य शासन जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उंचावून त्यांना स्मार्ट शाळांमध्ये रूपांतरित करण्यास कटिबद्ध असून खाजगी शाळेपेक्षा सरकारी अनुदानित शाळा अधिक सक्षम व दर्जेदार व्हाव्यात, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या प्रक्रियेत शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या माध्यमातूनच पुढची पिढी घडेल,असे प्रतिपादन सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५ सोहळ्यात दूरदृष्य प्रणालीद्वारे व्यक्त केले.

हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे उत्साहात पार पडला. यावेळी १२ शिक्षक आणि २ केंद्रप्रमुखांना गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. नामदेव किरसान होते, तर आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार रामदास मसराम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, प्राचार्य बळीराम चौरे, कार्यकारी अभियंता विनोद उध्दरवार, जिल्हा कृषी अधिकारी किरण खोमणे, उपअभियंता नितीन पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात खासदार डॉ. किरसान यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक उन्नतीसाठी शिक्षकांची भूमिका कळीची आहे. शिक्षकांनी आपले ज्ञान, मूल्ये व कामगिरी इतर सहकाऱ्यांनाही प्रेरणादायी ठरवावी, असे आवाहन केले. आमदार डॉ. नरोटे यांनी आर्टीफिशियल इंटेलिजन्सच्या युगात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षण देणे गरजेचे आहे, असे स्पष्ट केले. तर आमदार मसराम यांनी शाळांना आधुनिक भौतिक सुविधा आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त केले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीतच शिक्षकांची खरी कमाई दडलेली असल्याचे सांगितले. पुरस्कारप्राप्त शिक्षक उज्वला बोगामी यांनी दुर्गम भागातील आव्हानांवर मात करून केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. प्राथमिक शिक्षक प्रविण मुंजुमकर यांनी एआय युगात विद्यार्थ्यांना आधुनिक माध्यमांचा वापर करून शिक्षण देणे आवश्यक असल्याचे मत मांडले.

पुरस्कारप्राप्त शिक्षक व केंद्रप्रमुख…

कुरखेडा – बालाजी मुंडे, गडचिरोली – वनश्री जाधव, चामोर्शी – प्रिती नवघडे, कोरची – शितल कुमरे, देसाईगंज – प्रविण यादव मुंजुमकर, आरमोरी – हेमलता आखाडे, एटापल्ली – सिंपल मुधोळकर, भामरागड – उज्वला बोगामी, मुलचेरा – मुराली गाईन, अहेरी – सुरेखा मेश्राम, सिरोंचा – रमेश रच्चावार, धानोरा – विलास दरडे. तसेच केंद्रप्रमुख म्हणून चामोर्शीचे गुरुदास गोमासे व धानोऱ्याच्या संध्या मोंढे यांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांनी केले. संचालन अमरसिंग गेडाम व धनंजय दुम्पेट्टीवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी जितेंद्र साहाळा यांनी मानले.

Comments (0)
Add Comment