लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि,०२:
गडचिरोली–चामोर्शी महामार्गावर कुन्घाडा गावाजवळ गेल्या दोन दिवसांत घडलेल्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी कुन्घाडा ग्रामस्थांनी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णतः ठप्प झाली.
या भागातून जड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असून, रस्त्याच्या कडेला उभी राहणारी अवजड वाहने तसेच काही वाहनचालकांची बेदरकार व वेगवान वाहनचालना यामुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
दोन दिवसांपूर्वी शेतीची कामे आटोपून घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याचा उभ्या ट्रकला धडक बसून मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुपारी एका कारने रॉंग साइडने येत दुचाकीला धडक दिली. या अपघातात अतुल कोशमाशिले हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
या घटनांनंतर नागरिकांनी सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी करत महामार्गावर आंदोलन सुरू केले. अपघातांमागे जड वाहनांची वाहतूक कारणीभूत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी अपघातग्रस्त व मृत व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गडचिरोली व चामोर्शी तालुक्यातील पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला होता. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे तीन ते चार तास विस्कळीत झाली असून, वाहनचालक व प्रवाशांचे हाल झाले.
दरम्यान, गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. प्रशासन व आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था तसेच सुरक्षिततेच्या उपायांबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.