लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
काही मागण्या मान्य झाल्यामुळं मूक आंदोलन स्थगित करण्याचा संभाजीराजेंचा निर्णय धुडकावत सकल मराठा समाज आज रस्त्यावर उतरला. आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.
कोल्हापूर : आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा, लाख मराठा , जय भवानी, जय शिवाजी… अशा जोरदार घोषणा देत सकल मराठा समाजानं कोल्हापुरात सकाळी चक्का जाम आंदोलन केलं.
या आंदोलनात आता मूक नाही तर ठोक मोर्चा निघतील असा निर्धारच व्यक्त करण्यात आला. तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली.
कोल्हापुरातून मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाला सुरुवात झाली.खासदार
संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झालं. सरकार बरोबर झालेल्या चर्चेत काही मागण्या मान्य केल्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आपलं आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित केलं. कालच त्यांनी तशी घोषणा केली.
मात्र त्याला विरोध करत कोल्हापुरात मराठा क्रांती ठोक मोर्चा सुरुवात झाली आहे. विशेषता यामध्ये सकल मराठा समाजानंच पुढाकार घेतला.
संभाजीराजे यांना सरकार फसवत आहे असा आरोप करत मूक नाही आता ठोक आंदोलन असा निर्धार करत कोल्हापुरातील मराठा सकल मराठा समाजानं उग्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
हे आंदोलन मागे घ्यावे म्हणून सोमवारी पोलिसांनी विनंती केली होती. मात्र, ही विनंती अमान्य करत सकाळी हे आंदोलन करण्यात आलं.
सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या या आंदोलनास दहा वाजल्यापासूनच ताराराणी चौकाकडे जिल्हाभरातून सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांची रीघ लागली.
भगवे झेंडे हातात घेऊन कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात चौकात आल्यानंतर आंदोलनास सुरुवात झाली.
महिलांच्या बरोबरच लहान मुलंही आंदोलनात सहभागी झाली. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही, एक मराठा, लाख मराठा अशा घोषणांनी संपूर्ण ताराराणी चौक दुमदुमून गेला.
२६ जून पर्यंत सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या लेखी स्वरुपात मान्य न केल्यास २६ जून नंतर कोल्हापूरातूनच उग्र आंदोलन सुरू केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी बोलताना भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे म्हणाले, सरकार सध्या मराठा आरक्षणात टाईमपास करत आहे. युवकांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. त्यामुळे उगाच आश्वासन देत वेळ घालवण्यापेक्षा सरकारनं आता तातडीनं मागण्या मान्य करायला हवं.
माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील म्हणाले, टोकाची भूमिका घेतल्याशिवाय सरकार आमच्या मागण्या मान्य करणार नाही. याची आम्हाला खात्री झाली आहे. म्हणूनच आता आम्ही राज्यभर उग्र आंदोलन करणार आहोत. त्याची सुरुवात कोल्हापुरात झाली आहे.
तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे शहरात येणारी वाहतूक विस्कळीत झाली.
सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्यास चार दिवसानंतर ही ठिणगी राज्यभर पोहोचू असा इशारा यावेळी देण्यात आला.
हे देखील वाचा :
राज्य सरकार ओबीसी विरोधात काम करत आहे – माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर
ओबीसी आरक्षणासाठी भाजपा रस्त्यावर उतरणार – माजी राज्यमंत्री तथा आ. डॉ परिणयज फुके यांचे प्रतिपादन