गडचिरोली जिल्हयातील ३६१ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात सुधारणा

  • पहिल्या टप्प्यातील चामोर्शी व मुलचेरा तालुक्यांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश
  • दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक दि.१७ जानेवारी ऐवजी आता २० जानेवारीला
  • मतमोजणी २२ जानेवारी तर निकालाची अधिसूचना २७ जानेवारीला

गडचिरोली, दि.१६ डिसेंबर: जिल्हयातील ३६१ ग्रामपंचायतींचा सुधारीत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही टप्प्यात सहा-सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे चामोर्शी व मुलचेरा या दोन तालुक्यांचा समावेश आता निवडणूकीच्या दुसऱ्या टप्यात करण्यात आला आहे.

सुधारीत कार्यक्रमानूसार पहिल्या टप्प्यात कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली व धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये मतदान पुर्वीप्रमाणेच १५ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. तर आता दुसऱ्या टप्प्यात दि.२० जानेवारी २०२१ रोजी चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा येथे होणार आहे. मतदानाची वेळ दोन्ही टप्प्यांसाठी पुर्वीप्रमाणेच सकाळी ७.३० वा. पासून दुपारी ३.०० वा. पर्यंत असणार आहे.

या निवडणूकीसाठी तहसिलदार यांच्या कडून पहिल्या टप्प्यासाठी १५ डिसेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यासाठी १७ जानेवारी रोजी निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत. आता पहिल्या टप्प्यासाठी तहसिल कार्यालयात नामनिर्देशन पत्र मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक २३ ते ३० डिसेंबर दरम्यान व दुसऱ्या टप्प्यासाठी २८ डिसेंबर ते १ जानेवारी सकाळी ११ वा. ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत सार्वजनिक सुट्टया वगळून असणार आहे. नामनिर्देशन छाननी पहिल्या टप्प्यासाठी दि. ३१ डिसेंबर रोजी व दुसऱ्या टप्प्यासाठी ४ जानेवारी रोजी असणार आहे.

नामनिर्देशन मागे घेण्याचा अंतिम दिनांक ४ जानेवारी २०२१ पहिल्या टप्यासाठी तर दुसऱ्या टप्यासाठी ६ जानेवारी रोजी दुपारी ३.०० वा. पर्यंत असणार आहे. दोन्ही टप्प्यासाठी अनुक्रमे दि.४ जानेवारी व ६ जानेवारी रोजी दुपारी ३.०० वा. नंतर निवडणूक चिन्ह नेमून देणार आहेत तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी दोन टप्प्यात दि. १५ व २० जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. दोन्ही टप्प्यातील निवडणूकीची मतमोजणी २२ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. तसेच दि.२७ जानेवारी रोजी निकालाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. सदर निवडणूकीत मतदारांनी कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.