जीवदानी डोंगरावर वृक्षारोपण करून जपली ‘कुणबी अस्मिता’

'निसर्ग प्रेमी ग्रुप'चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

विरार, 16 जुलै – सोशल मिडिया च्या माध्यमातून ‘निसर्ग प्रेमी ग्रुप’ तयार करून विरार येथील जीवदानी देवी डोंगरावर वृक्षारोपण करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा स्तुत्य उपक्रम ‘वसई-विरार कुणबी अस्मिता’ यां संस्थेच्या पुढाकाराने राबवण्यात आला आहे. यावेळी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेत जीवदानी मातेच्या डोंगरावर वड, पिंपळ, बेवा, पळस, आवळा, उंबर, काजू अशा ७०० पेक्षा जास्त झाडांची लागवड करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी कटीबद्द राहण्याचे आवाहन यावेळी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले.

वसई विरार नालासोपारा या परिसरात राहणाऱ्या कुणबी बांधवांची मोट बांधून नेहमीच समाजोपयोगी कार्यात अग्रेसर असणारे संजीवनी रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी तथा ‘वसई-विरार कुणबी अस्मिता’ यां संस्थेचे अध्यक्ष तुकाराम पष्टे यांनी ही वृक्षा रोपणाची संकल्पना मांडली. तसेच ती तडीस नेण्यासाठी पस्टे यांनी व्हॉट्सएप वर ‘निसर्ग प्रेमी ग्रुप’ बनवला, आणि बघता बघता शेकडो निसर्ग प्रेमी या ग्रुपमध्ये सहभागी झाले. या ग्रुपच्या माध्यमातून आज १६ जुलै रोजी १५० कार्यकर्त्यासह ‘वसई-विरार कुणबी अस्मिता’ यां संस्थेच्या पुढाकाराने हे वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी जीवदानी ट्रस्टने झाडासाठी खड्डे खोदण्यासाठी बहुमूल्य सहकार्य केले, या साठी नितीन पाटील व वन विभागातील निवृत्त अधिकारी विलास पांड्ये यांनी विशेष मेहनत घेतली. नरेश पाटील पारोळ यांनी स्वत: २०० काजूची रोपे बनवून या वृक्षारोपणास स्वखर्चाने आणून दिली. कार्यक्रमाचे सुरुवातीला मोहन पाटील यांनी हा उपक्रम गेल्या पाच सहा वर्षा पासून विरार मधील समस्त कुणबी समाज राबवत आहे, त्याला या निसर्ग प्रेमी कडून चांगला प्रतिसाद कसा लाभत आहे याबाबत माहिती दिली.

तर पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विजय चोघाला यांनी पर्यावरण संवर्धनाची सर्वांना शपथ देवून, त्यासाठी कटीबद्द राहून यथा योग्य पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदतरूप होवू या असे सांगितले. झाडे लावून आपण काही देवावर किंवा या श्रुष्टीवर उपकार करीत नसून, या निसर्गाने आपल्याला जीवन दिले आहे, त्या निसर्गाचे आपण काही देणे लागतो म्हणून हे काम आपण मनापासून करा व लावलेल्या झाडांची निगा राखून ती सुरक्षित कशी राहतील याची काळजी घेणे गरजेचे आहे असे निसर्गप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते चंदन पोतदार यांनी सांगितले. या उपक्रमात कुणबी समाज उन्नती संघ मुंबई शाखा विरारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना झाडे लावतांना काय काळजी घ्याल याची माहिती तुकाराम पष्टे यांनी देवून, शक्य झाल्यास या लावलेल्या झाडांना पावसाळ्या नंतर पाणी देता यावे म्हणून ठिबक सिंचन व्यवस्था आपली संस्था करेल अशी ग्वाही दिली. परंतु काही वेळा एखादा विचित्र स्वभावाचा वाटसरू आग लावून गवत पेटवून देतो व एवढ्या मेहनतीने व आत्मीयतेने लावलेली झाडे आगीमध्ये भस्मसात होत असतात. हे सर्व खरे असले तरी सुद्धा आपण प्रयत्न सोडायचे का? हा मोठा प्रश्न येतो, या साठी सर्वानीच प्रयत्न केले पाहिजेत असे पष्टे यांनी सांगुन, मुसळधार पाऊस असून वृक्षा रोपण कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

हे पण वाचा :-

kunbi samajplantation