महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता; मुख्यमंत्री आजच निर्णय घेणार, नियमावलीही आजच तयार होणार: अस्लम शेख

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १३ एप्रिल: “महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल”, असं मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख यांनी दिली. ते मु्ंबईत पत्रकारांशी बोलत होते.

अस्लम शेख म्हणाले, “गेल्या आठवड्यापासून आपण मीटिंग घेऊन सगळे विरोधी पक्षाच्या लोकांना विश्वासात घेत आहोत. टास्क फोर्सशी चर्चा झाली. आपण लोकांचीही मतं जाणून घेत आहोत. ब्रेक द चेन यानुसार आज निर्णय होईल. लॉकडाऊन करणे गरजेचं आहे. मुंबई शहरामध्ये किंवा या राज्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त टेस्ट केले आहेत. त्यामुळे केस जास्त आहेत.

साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करावं लागणार आहे. त्याबाबत नियमावली आज जाहीर होणार आहे. परप्रांतियांना आपण घरी जाण्यासाठी अडवत नाही, असंही अस्लम शेख यांनी सांगितलं.

राज्यात १२-१३ दिवसांचा लॉकडाऊन, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्रात लॉकडाऊन १२ ते १३ दिवसांचा असू शकतो, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. राज्यातल्या परप्रांतिय कामगारांनी महाराष्ट्र सोडू नका.

तुमची सगळी काळजी राज्य सरकारकडून घेतली जाईल. महाविकास आघाडी सरकार आणि कामगार मंत्री म्हणून महाराष्ट्र तुमची काळजी घेईल याच आश्वासन देतो, असं मुश्रीफ म्हणाले.

परप्रांतिय नागरिकांनी गर्दी करून रेल्वे स्टेशन, बस स्थानकांवर गर्दी करू नये. महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे. लॉकडाऊन १२ ते १३ दिवसांचा असू शकतो, असं मुश्रीफांनी सांगितलं.

एनआयए प्रमुख शर्मांच्या बदलीची चौकशी झाली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला मार्फत ही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

लॅाकडाऊनमध्ये जिल्हाबंदीपासून इतर कडक निर्बंध असतील. लॅाकडाऊन जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनी अंमलबजावणी होणार आहे. लोकांना तयारी करण्यासाठी वेळ दिला जाईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वजेट्टीवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने ऑक्सिजनच उत्पादन वाढवणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात लवकरच ऑक्सिजनच प्लांट सुरु होणार असंही ते म्हणाले.

सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांची भूमिका

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केलीय. मात्र, याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील स्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसंच सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केलीय. राज्यातील स्थिती पाहता जनतेला थोडी कळ सोसावी लागेल. तज्ज्ञांच्या मते १४ दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. तज्ज्ञांच्या मताला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा दिलाय. मात्र, मुख्यमंत्री किमान 8 दिवस कडक लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहेत. ८ दिवसानंतर एक एक गोष्ट हळू हळू सुरु करु, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.

Aslam Sheikh