२२ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान महापालिका क्षेत्रात मिशन इंद्रधनुष्य

० ते २ वयोगटातील बालके व गरोदर मातांचे लसीकरण करणार

विशेष मोहिमेला सहकार्य करण्याचे बृहन्मुंबई महापालिकेचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २१ फेब्रुवारी: बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन असून पहिल्या दोन वर्षात बालकांचे लसीकरण झाल्यास पुढील आयुष्यात विविध आजारांचा मुकाबला करणे त्यांना शक्य होते. अर्धवट लसीकरण झालेले व लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात. त्याचसाठी ० ते २ वर्ष वयोगटातील बालके व गरोदर माता यांचे लसीकरण करण्यासाठी भारत सरकारने विशेष लसीकरण मोहीम ही ऑक्टोबर २०१७ पासून ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य’ या नावाने सुरु केली आहे. या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील २२ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२१ दरम्यान विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. आपल्या देशात बालमृत्यू व प्रसूती दरम्यान होणा-या मातांच्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यास या लसीकरणामुळे मदत होणार आहे. तरी नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

केंद्र शासनाने मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रमांतर्गत चार मोहिमा मुंबईत आजतागायत यशस्वीरित्या राबविल्या आहेत. २०२१ मध्ये ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य’ मोहीम फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यात कार्यभूत होणार आहे. प्रत्येक महिन्यात १५ कार्यालयीन कामकाजाचे दिवस ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सदर मोहीम ही दोन फे-यांमध्ये राबविण्यात येणार असून, पहिली फेरी फेब्रुवारी महिन्यात तर दुसरी फेरी मार्च महिन्यात होणार आहे. या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य केंद्रांतर्फे शहरी भागातील झोपडपट्टी, बांधकामे, अतिदुर्गम भाग किंवा डोंगराळ भाग, लसीकरणाचे काम असणारे भाग इत्यादी जोखिमग्रस्त भागांमध्ये विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

पल्स पोलिओ कार्यक्रम अंतर्गत आढळून आलेल्या अति जोखिमग्रस्त भागांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. या अति जोखिमग्रस्त भागांमध्ये लसीकरणापासून पूर्णतः व अंशतः वंचित असलेल्या मुलांचे प्रमाण जास्त आढळून येते. विशेष मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रमांतर्गत या अति जोखिमग्रस्त भागांमध्ये विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येते.

Mission-Indradhanush