छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्पासाठी टोयोटा किर्लोस्करसमवेत सामंजस्य करार राज्यातील मोटार निर्मिती उद्योगात क्रांती आणणारा प्रकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगात देखील एक क्रांती येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथे टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा तर होईलच शिवाय एकूणच राज्य आणि भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगात देखील एक क्रांती येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज सह्याद्री अतिथिगृह येथे राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्स निर्मितीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते .

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, किर्लोस्कर मोटर्सच्या उपाध्यक्ष मानसी टाटा, गीतांजली किर्लोस्कर, टाटा किर्लोस्करचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझु योशीमुरा, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे. एमआयडीसी सीईओ विपिन शर्मा आदि उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर येथे या प्रकल्पातून इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सचे उत्पादन होणार आहे. यासाठी २० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून सुमारे ८ हजार थेट आणि अप्रत्यक्ष ८ हजार अशी १६ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पातून वर्षाला ४ लाख कार्सची निर्मिती होणे अपेक्षित आहे.

गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महसूल मंत्र्यांनी घेतली भेट