लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, दि. १३ मार्च: एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रं द्या, अन्यथा मुंबईत येऊन उग्र आंदोलन छेडू, असा इशारा भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. जूनमध्ये झालेल्या परीक्षेचं नियुक्तीपत्रं देण्याने कोरोना नियमांचा फज्जा कसा उडेल? असा सवालही त्यांनी राज्य सरकारला केला आहे.
पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्र सरकार पोलिसांना पुढे करून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडीत काढत आहे. परवाही पोलिसांना पुढे करून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडीत काढलं. आजही काही ठरावीक विद्यार्थी नियुक्तीपत्रं मिळावं य मागणीसाठी आंदोलन करत होते. पण कोरोनाचं कारण देऊन या विद्यार्थ्यांवर दबाव वाढवण्यात आला, असा आरोप पडळकर यांनी केला आहे.
जे विद्यार्थी अधिकारी म्हणून एमपीएससीमध्ये सिलेक्ट झाली आहेत. त्यांना नियुक्तीपत्रं द्यावं, नाहीतर आम्ही मुंबईत आंदोलन करू, असा इशारा देतानाच आंदोलन करण्याची वेळ सरकारने येऊच देऊ नये, परीक्षा जूनमध्ये झाली. नियुक्ती पत्रं अजून दिली नाहीत. सरकार नऊ महिन्यांपासून झोपा काढत आहे का? वेळीच नियुक्तीपत्रं दिलं तर विद्यार्थी कशाला आंदोलन करतील? असा सवाल त्यांनी केला.
केवळ 413 विद्यार्थांना नियुक्तीपत्रं द्यायचं आहे. त्यासाठी कोरोनाचं कारण देण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना केवळ नियुक्तीपत्रं देण्यात येत आहे. नियुक्तीपत्रं दिल्याने कोरोना नियमांचा असा कोणता फज्जा उडणार आहे?, असा सवालही त्यांनी केला.