जालोरमध्ये दलित विद्यार्थ्याची  झालेली हत्या  हा मानवतेला लागलेला कलंक  – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई दि. १५ ऑगस्ट :  जातीवाद हा स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाला लागलेला कलंक आहे. जातीवादाच्या अजगराचा  स्वातंत्र्याला विळखा पडला असून जातिवाद संपुष्टात आल्याशिवाय देश खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही. राजस्थान च्या जालोर मधील अवघ्या ९ वर्षांच्या कोवळ्या दलित विद्यार्थ्यांची केवळ त्याने सवर्ण शिक्षकांसाठी राखून ठेवलेल्या माठातुन पाणी पिल्याच्या रागातून झालेली निर्घृण हत्या हा मानवतेला लागलेला कलंक आहे.या अमानुष जातीवादाचा आम्ही तीव्र निषेध करीत असून मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

सामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नाही याची प्रचिती आशा जातीवादी घटनांतून येते. 

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात ; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात जातीवादाचे विष देशाला कंठात धरावे लागत आहे.  जातीवादाचे विष देश आणि समाजातून नष्ट केले पाहिजे. याचा आज स्वातंत्र्य दिनी देशाने निर्धार केला पाहिजे. असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.

राजस्थान मध्ये दिवसेंदिवस दलित समाजावर अत्याचार वाढत आहे. दलितांवरील अत्याचार रोखण्याकडे राजस्थान चे मुख्यमंत्री  गेहलोत यांचे सरकार पुरेसे लक्ष देत नाही. दलितांवर वाढते अत्याचार रोखण्याकडे अपयशी ठरलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्र्यानी राजीनामा द्यावा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.

जालोर मधील अवघ्या ९ वर्षांच्या तिसरीत शिकणाऱ्या दलित विद्यर्थ्यांला  सवर्णांसाठी ठेवलेल्या माठातून  पाणी पिला या कारणासाठी अत्यंत क्रूरपणे शिक्षकाने जीवे ठार मारले. हे अत्यंत अमानुष माणुसकीला काळिमा फासणारे काळीज दुःखाने जाळून टाकणारे प्रकरण असून या प्रकरणी आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

हे देखील वाचा :

उंदराला सापडली चिंधी… इकडे ठेवू का तिकडे ठेवू.., मंत्री गुलाबराव पाटील यांचा शिवसेनेचे संजय राऊत यांना टोला

समीर वानखेडे यांना केंद्रीय जात पडताळणी समितीने दिली क्लीन चीट.

 

Ramdas Athavale