लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सुरजागड प्रकल्पातील उत्खननाला नक्षलवाद्यांनी पत्रक टाकून विरोध केला आहे. गोंडी भाषेत नक्षली पत्रक टाकून सुरजागड प्रकल्पाला सहाय्य करणाऱ्या लोकांना नक्षल्यांनी इशारा देण्यात आला आहे.
सदर पत्रकातून स्थानिक एटापल्ली, आलापल्ली येथील सहाय्य करणाऱ्याचा स्पष्ट नावासह उल्लेख असल्याने हा ईशारा देण्यासाठी प्रयत्न होत आहे का? सदर पत्रकात लोकप्रतिनिधीसह आलापल्ली येथील या प्रकल्पाला साहाय्य करणाऱ्या व काही विशिष्ट प्रसार माध्यमाना मॅनेज करणाऱ्या डॉक्टर आणि एटापल्ली येथील काही व्यापारी, त्रिवेणी कंपनीच्या वतीने काम सांभाळणाऱ्या सेनेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा समावेश आहे. त्यामुळे या पत्रकातील मजकुरामुळे चर्चेला उधाण आले असून खळबळ माजली आहे.
हे तथाकथीत नक्षली पत्रक महिन्याभरापूर्वी परिसरात आढळून आले आहे. लाल अक्षरात लिहिल्या गेलेल्या या पत्रकात भाकपा माले माओवादी पिपुल्स वॉर ग्रुप असा उल्लेख आहे. हे पत्रक नक्षल्यांनीच लिहिले की कुणी हेतूपरस्पर खोडसरपणा केला हे पोलीस विभागाच्या चौकशीत निष्पन्न होईलच. मात्र या पत्रकामुळे चर्चेला उधान आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील बहुचर्चित व तेवढ्याच वादग्रस्त सुरजागड लोहखनिज प्रकल्पाचे उत्खननाचे काम मोठ्या प्रतीक्षेनंतर सुरू झाले. मात्र, नक्षलवाद्यांचा या प्रकल्पाला विरोध दिसून येत आहे. अशातच सुरजागड लोहखनिज पहाडाच्या परिसरात नक्षलवाद्यांची पत्रके आढळून आल्याने पुन्हा परिसरात खळबळ व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पत्रकात लोहखनिजाचे उत्खनन करणाऱ्या कंपनीला मदत करणाऱ्या लोकांना नक्षलवाद्यांनी पत्रकातून निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात येथे काम करणारे व या प्रकल्पाला मदत करणारे नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर येण्याची चिन्हे आहेत.
लॉयड मेटल्स कंपनीच्या नावे या प्रकल्पासाठी लीज मंजूर असून येथील लोहखनिज उत्खननाला ग्रामसभा व नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून हे काम बंद होते. पण, लॉयड मेटल्स कंपनीकडून पुढील उत्खननाचे काम तामिळनाडूतील सेलम येथील त्रिवेणी अर्थमुव्हर्स प्रा. लि. कंपनीला मिळाले असून हे काम पुन्हा सुरू झाले आहे.
विशेष म्हणजे यापूर्वीसुद्धा नक्षलवाद्यांनी या प्रकल्पाला विरोध करून ८३ वाहनांची जाळपोळ केली होती. त्यापूर्वी कंपनीच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याची हत्या देखील झाली होती. त्यानंतर एका अपघातानंतर या प्रकल्पाचे काम बंद झाले होते. त्यांनतर त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनी ने काम हाती घेतल्यानंतर पोलिसांच्या सुरक्षेविना उत्खननास सुरुवात झाली आहे.
विशेष म्हणजे या भागातील ग्रामसभांचा आधीपासूनच या प्रकल्पाला विरोध असतांना स्थानिक विरोध डावलून उत्खननास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान स्थानिकांचा विरोध डावलून त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीने ज्या पद्धतीने सोयीस्कर राजकारण सुरु केले आहे. त्यावरून विद्यमान राज्यसरकार अडचणींत येण्याची शक्यता आहे. याला कारण ठरले ते मंगळवारी गडचिरोलीत जिल्हाधिकाऱ्यामार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, संबंधित मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेले निवेदन.
सुरजागड इलाखा पारंपारिक समितीने सादर केलेल्या निवेदनात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर उघडपणे आरोप केला आहे. त्यात त्यांनी स्थानिक आमदारांवर रोष व्यक्त केला आहे.
निवेदनानुसार जर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे आदिवासीच्या जल, जंगल, जमिनीचे संरक्षणकर्ते आहे तर सध्यस्थितीत सुरजागड मध्ये जे काही उत्खनन सुरु आहे त्याला त्यांचे समर्थन आहे किंवा विरोध आहे याची उघड भूमिका सरकारने घ्यायला हवी, अशी स्पष्ट भूमिका आदिवासी नेत्यांनी या निवेदनात मांडली आहे. मात्र वर्तमान परिस्थितीत असे चित्र दिसून आले नाही. असा उघड आरोप गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नेत्यांनी केला आहे.
त्यामुळे आगामी काळात गडचिरोली जिल्ह्याचे राजकारण, स्थानिक प्रशासन आणि नक्षलवाद्यांची भूमिका यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला अनुसरून नक्षलवाद्यांनी टाकलेले हे पत्रक आणि त्यातील टाकलेल्या नावाचा उल्लेख पाहूजाता भविष्यात सुरजागड प्रकरण पेट घेण्याची दाट शक्यता आहे.
हे देखील वाचा :
सुरजागड लोहप्रकल्प रद्द करा : राज्यपालांकडे शेकडो ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी केली मागणी
डाॅक्टरांच्या ढेपाळवृत्तीमुळे कांग्रेस अध्यक्षांचा दुर्दैवी मृत्यू!
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या आस्थापनेवर GD कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 25271 जागांसाठी मेगाभरती