समृद्ध गावांसाठी अविरोध निवडणूकांची गरज- ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर 20 नोव्हें :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता क्रांतीकारी व परिवर्तनवादी विचार देणारी आहे. त्यात पानोपानी समग्र ग्रामसुधारणेची असंख्य सूत्रे आहेत. माणसाला माणूस बनविणारा मानवधर्म राष्ट्रसंतांनी सांगितला. प्रत्येक गाव सुजलाम सुफलाम व्हावे. गावात सामुदायिक श्रमदान, शांतता व सुव्यवस्थतेच्या दृष्टीकोनातून ग्रामसभेच्या माध्यमातून अविरोध निवडणूका होणे काळाची गरज आहे. यासाठी गावक-यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले. युवा जनहित बहुउद्देशीय संस्था आयोजित आदर्श ग्राम घाटकुळ येथे ‘दिव्यग्राम २०२०’ महोत्सवात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

आदर्श घाटकुळ गावाची दिवसेंदिवस होणारी प्रगती अबाधित राहण्यासाठी आगामी निवडणुका पक्ष व मतभेद विसरुन अविरोध व्हावी अशी भुमिका त्यांनी मांडली. अध्यक्षस्थाहून बोलतांना पं.स.सदस्य विनोद देशमुख म्हणाले, गावाने गावासाठी केलेले परिश्रम मोठे आहे. घाटकुळ राज्यात आदर्श ग्राम म्हणून नावलौकिक आहे. गावाचे हित लक्षात घेवून गावात अविरोध निवडणूकीतून पुन्हा आदर्श निर्माण करता येईल, हा आशावाद मांडला.

यावेळी ग्रामविकासासाठी योगदान देणा-या गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच प्रीती मेदाळे, गंगाधर गद्देकार, पत्रू पाल, शशिकला पाल, सुमन राऊत, विमल झाडे, देवराव मेदाळे, विठ्ठल धंदरे यांचा सत्कार करण्यात आला‌. आंतरराष्ट्रीय परिसंवादात देशाचे प्रतिनिधित्व करणारी बालपंचायत सरपंच काजल चांगदेव राळेगावकर व ग्राम कार्यकर्ता दिलीप कस्तुरे यांचा गौरव करण्यात आला.