लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टी कोणत्याही राजकीय आघाडीशिवाय स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचा ठाम आणि अंतिम निर्णय गडचिरोली येथील पक्ष कार्यालयात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय पक्षप्रमुख बहनजी मायावती यांच्या स्पष्ट आदेशानुसार घेण्यात आल्याने, गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणे आकार घेण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पूर्व विदर्भ संयोजक वामन सोमकुवर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत गडचिरोली जिल्हाध्यक्ष भास्कर मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच आगामी निवडणुकांची रणनिती, उमेदवार निवड आणि बूथ पातळीवरील कामकाज यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पक्षाचे वरिष्ठ नेते मुरलीधर मेश्राम यांनी सांगितले की, बसपाचा स्वबळावर लढण्याचा निर्णय अंतिम असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही स्तरांवर पक्ष स्वतंत्र उमेदवार उभे करणार आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देतानाच अनुभवी व निष्ठावान कार्यकर्त्यांनाही योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल. इच्छुक उमेदवारांनी थेट जिल्हाध्यक्ष भास्कर मेश्राम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष सोमाजी धारणे, जिल्हा प्रभारी जोगेश्वर माने, जिल्हा महासचिव सुधीर वालदे, माजी जिल्हाध्यक्ष वामनराव राऊत, राजेश लिंगायत, हरेंद्र मेश्राम, योगराज बांबोळे, सिद्धार्थ घुटके, ज्ञानोदय वालदे, महिला जिल्हाध्यक्ष मायाताई मोहुर्ले, शहराध्यक्ष वेणुताई खाब्रागडे, सुमनताई कऱ्हाडे यांच्यासह मोठ्या संख्येने बसपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात सध्या राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असताना, ग्रामीण व आदिवासी भागात बसपाचा प्रभाव वाढताना दिसून येत आहे. सामाजिक न्याय, हक्कांचे संरक्षण आणि सत्तेतील समतोल सहभाग या मुद्द्यांवर पक्षाला नव्याने पाठिंबा मिळत असून, मतांची तुकडेबाजी सुरू असलेल्या या राजकीय वातावरणात बसपाचा स्वतंत्र मतदार वर्ग पुन्हा सक्रिय होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये बसपाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बूथ पातळीवरील संघटन अधिक मजबूत करणे, उमेदवारांची काटेकोर निवड आणि थेट जनतेशी संवाद वाढवणे, यावर पक्षाने विशेष भर दिला असून, गडचिरोलीच्या राजकारणात बहुजन समाज पार्टी पुन्हा एकदा निर्णायक भूमिका बजावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.