नवी दिल्ली, 26 जानेवारी : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली अखेर लाल किल्ल्यावर धडकली आणि लाल किल्ल्यावर चढून शेतकरी आंदोलकांनी किल्ल्याच्या घुमटावर झेंडा फडकावला
कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी आज प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांची विराट ट्रॅक्टर रॅली अखेर दिल्लीच्या तख्ताजवळ पोहोचली आहे. दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोड बंदोबस्त लावून सुद्धा शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन लालकिल्ल्यावर धडकले आहे. लाल किल्ल्यावर पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी जोरदार जल्लोष केला त्यानंतर संतप्त झालेला जमाव हा लाल किल्ल्यात घुसला आणि जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. काही वेळानंतर शेतकरी आंदोलकांनी किल्ल्याच्या घुमटावर आंदोलनाचा झेंडा फडकावला.
त्याआधी काही ठिकाणी शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. दिल्ली पोलिसांकडून ठिकठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ट्रॅक्टर जावू नये म्हणून दिल्ली शहराच्या बसेस आडव्या लावण्यात आल्या आहेत.
नांगलोई, नजफगड, बहादुरगड येथून परत मागे जात शेतकऱ्यांची रॅली टिकरी बार्डरवर पोहोचली. त्यावेळी शेतकऱ्यांनी नांगलोई इथं बॅरिकेटस तोडून टाकले आहे. पोलिसांनीही शेतकऱ्यांच्या रॅलीवर अश्रू धुरांचा मारा केला.
त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली होती. पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला तर काही ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे.
ठिकठिकाणी पोलिसांसोबत संघर्ष केल्यानंतर अखेर शेतकरी लाल किल्ल्यावर धडकले. त्यानंतर किल्ल्यावर चढाई करून शेतकरी आंदोलकांनी किल्ल्याच्या घुमटावर आंदोलनाचा झेंडा फडकावला आहे.