लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई: पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे भारतीय नौदलाच्या तीन महत्त्वाच्या युद्धनौका – आयएनएस सुरत, आयएनएस नीलगिरी आणि आयएनएस वाघशीर पाणबुडीचे राष्ट्रार्पण करण्यात आले. पंतप्रधान मोदींसह देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारही यावेळी उपस्थित होते. भारतीय नौदलासाठी आजचा इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवावा असा आहे. एकाच दिवशी दोन युद्धनौका आणि एक पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात येण्याची पहिलीच वेळ आहे. आज देशाला दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीची वैशिष्ट्ये काय आहेत काय आहे हे जाणून घेऊयात.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
15 जानेवारी सेना दिन म्हणूनही साजरा केला जातो. भारत भूमीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक विराला मी नमन करतो. भारतमातेच्या रक्षणात असलेल्या प्रत्येक जवानाला शुभेच्छा देतो. आज भारताचे गौरवशाली समुद्री साम्राज्य आणि आत्मनिर्भर भारतासाठीही मोठा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही नौदलाला नवी शक्ती नवा मार्ग दिली होती. त्यांच्याच पावन धरतीवर २१ दशकातील नौदलाला अधिक सशक्त बनवण्यासाठी मोठे पाऊल उचलत आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
तसेच एकाच वेळी युद्धनौका, पाणबुडींचे लोकार्पण होत आहे. या सर्व युद्धनौका मेड इन इंडिया आहेत, ही अभिमानाची बाब आहे. भारतीय नौदलाला, या नौका निर्माण करणाऱ्या कामगारांना, अभियंत्यांना शुभेच्छा देतो. आजचा कार्यक्रम आपल्या भविष्यातील आकांक्षांना जोडतो. जगभरात भारताचे सामर्थ्य वाढत असून भारत हा विस्तारवाद नाही तर विकासवादाच्या भावनेने काम करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.