कराड, 6 फेब्रुवारी : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात मागच्या अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज देशभरात विरोधकांकडून चक्काजाम आंदोलन सुरू आहे. कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण यादेखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेवर टीका केली.
‘आज शेतकरी रस्तावर उतरला असताना पंतप्रधान आणि अधिकारी वातानुकुलीत कार्यालयात बसून शेतकरी यांची चेष्टा करत आहेत. जर देशाचा पंतप्रधान शेतकरी असते तर त्यांना शेतकरी यांची बाजू पटली असती. पंतप्रधान मोदींना शेतातील काय कळते?’ असा सवाल सत्वशिला चव्हाण यांनी विचारला.
कराडमधल्या या चक्काजाम आंदोलनाच्या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं, यामध्ये सत्वशिला चव्हाण यांचाही समावेश होता.