लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना महामारीवर उपाय म्हणजे कोव्हीड लसीकरण आहे. सर्वांनी लसीकरण करावे यासाठी जिल्ह्यातील कवींनी जनजागृतीसाठी ‘श्वास पुन्हा घेण्यासाठी’ प्रातिनिधिक कवितासंग्रहातून संदेश दिला आहे. हा उपक्रम स्तुत्य असून प्रशासनाच्या मोहीमेला सहाय्यकारी असल्याचे मत कॅबीनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
फिनिक्स साहित्य मंच चंद्रपूरतर्फे संदेश कोरोना लसीकरणाचा या विषयावर ‘श्र्वास पुन्हा घेण्यासाठी’ हा जिल्ह्यातील कविंच्या कवितांचा प्रातिनिधिक संग्रह प्रकाशित करण्यात आला. प्रियदर्शनी सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते या संग्रहाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. यावेळी आ. किशोर जोरगेवार, जि.प.अध्यक्षा संध्या गुरनूले, जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राज गहलोत, डॉ.राठोड उपस्थित होते. या कवितासंग्रहाचे संपादन चिमूरचे गटविकास अधिकारी व कवी धनंजय साळवे, फिनिक्सचे अध्यक्ष नरेशकुमार बोरीकर, कवी अविनाश पोईनकर, कवी गोपाल शिरपूरकर यांनी केले. यात जिल्ह्यातील कवी सुरेंद्र इंगळे, धर्मेंद्र कनाके, जयवंत वानखडे, सुनील बावणे, संतोषकुमार उईके, विजय वाटेकर, पंडीत लोंढे, राजेंद्र घोटकर, मिलेश साकूरकर, अरुण घोरपडे, बि.सी.नगराळे, नरेंद्र कन्नाके, राजेंद्र पोईनकर, सुधाकर कन्नाके, संभाजी गावंडे यांच्या कवितांचा समावेश आहे.
प्रकाशन सोहळ्यात या संग्रहाचे संपादक गटविकास अधिकारी, कवी धनंजय साळवे, नरेशकुमार बोरीकर यांची विशेष उपस्थिती होती. कोरोना लसीकरण जनजागृतीच्या कवितांमुळे जिल्ह्यात प्रबोधन घडून येईल असा आशावाद यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा :
ओबीसींना न्याय मिळाल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन