आरबीआयचा मोठा निर्णय? – 500 रुपयांच्या नोटा हळूहळू चलनातून बाद होण्याची शक्यता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) देशातील सर्व बँकांना आदेश दिले आहेत की, सप्टेंबर 2025 पर्यंत एटीएममध्ये केवळ 100 व 200 रुपयांच्या नोटाच भराव्यात. त्यामुळे 500 रुपयांच्या नोटांचे प्रमाण कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे संकेत मिळत आहेत. या निर्णयामागे केंद्र सरकार व आरबीआयचा उद्देश नोटांचे प्रमाण व व्यवस्थापन सुलभ करणे, तसेच कमी मूल्याच्या नोटांचा व्यवहारात वापर वाढवण्याचा आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

याआधी 2023 मध्ये आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करत असल्याची घोषणा केली होती. त्या निर्णयानंतर आता 500 रुपयांची नोटसुद्धा हळूहळू बाद होण्याच्या प्रक्रियेत आहे, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. माहितीप्रमाणे, आरबीआयने 500 रुपयांच्या नोटांच्या छपाईतही घट केली आहे. त्यामुळे भविष्यात या नोटा देखील चलनातून पूर्णतः हद्दपार होतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

विशेष म्हणजे, मोठ्या मूल्याच्या नोटांमुळे काळा पैसा साठवणे सोपे होते. त्यामुळे सरकारने कॅशलेस इकॉनॉमीच्या दिशेने टाकलेले हे आणखी एक पाऊल असू शकते. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी छोट्या मूल्याच्या नोटांचा वापर प्रोत्साहन देणे, हा यामागचा दूरगामी उद्देश असल्याचे बोलले जाते.

या पार्श्वभूमीवर, लोकांनी 500 रुपयांच्या नोटांचा साठा न ठेवता त्याचा योग्य वापर करावा, असेही बँकिंग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुढील काही महिन्यांत या विषयावर आरबीआयकडून अधिक स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.

500noteRBI