वरोऱ्यातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे किमान वेतन मिळण्यासाठी केली याचिका दाखल.

नगर परिषडेच्या मुख्याधिकाऱ्यास नोटीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सामाजिक कार्यकर्ते राहुल जानवे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि सुरक्षा साहित्य मिळावे, याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केलेली आहे. सदर याचिकेवर न्यायालयाने बुधवारी नगर विकास विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी व कंत्राटदार केजीएन कॅटरर्स यांना नोटीस काढून चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

न्यायालया दाखल याचिकेवर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी असता  कंत्राटामधील करारानुसार, केजीएन कॅटरर्सने स्वच्छता कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि सुरक्षा साहित्य देणे आवश्यक आहे. परंतु, त्यांनी कराराची पायमल्ली केलेली असून  ते स्वच्छता कर्मचाऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना तक्रारी केल्या, पण त्यांनी काहीच कारवाई केली नाही, असा याचिकाकर्त्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, चौकशीच्या आधारावर मुख्याधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी आणि कंत्राट कराराची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. स्मिता दशपुत्रे यांनी कामकाज पाहिले.

हे पण पहा,