जेव्हा राजकीय विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही तेव्हा त्यांना पोलीस, ईडी, सीबीआयसारख्या हत्यारं वापरावी लागतात.
पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्याच्या चर्चांनंतर राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर सडकून टीका केली.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 28 डिसेंबर :- “जेव्हा राजकीय विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही तेव्हा त्यांना पोलीस, ईडी, सीबीआयसारख्या हत्यारं वापरावी लागतात. राजकीय विरोधकांवर भडास काढण्यासाठी सीबीआय, ईडीचा वापर सुरु आहे. पण ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही. आम्ही ईडीला नोटीसला घाबरत नाही. आमच्यापैकी कोणी काहीही चुकीचं केलेलं नाही,” अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्याच्या चर्चेनंतर राऊत यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. इतकंच नाही तर सरकार टिकू देऊ नका असं सांगत भाजपचे काही नेते धमकावत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
हे पण वाचा:- यंदा गच्चीवर ‘नो 31 st पार्टी’, न्यू इयर पार्टीला बंदी
भाजपचे तीन नेते हे सतत ईडीच्या कार्यालयात जाऊन कागदपत्र घेऊन येत आहे. त्यानुसारच ही नेते बोलत आहे. गेल्या वर्षभरापासून भाजपचे काही नेते आणि हस्तक हे मला सातत्याने येऊन भेटत आहे. या सरकारच्या मोहात पडू नका, हे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पाडायचे ठरवले आहे. या ना त्या मार्गाने इशारे देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागेही मला धमकावण्यात आले आहे’ असा खुलासा राऊत यांनी केलाय.
‘ईडी हा काही महत्त्वाचा विषय नाही. कधी काळी या संस्थांना प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. सीबीआय, आयकर विभागाने काही कारवाई केली तर त्यात गांभीर्य होते. पण, गेल्या वर्षात ईडीने नोटीस बजावणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने भडास काढणे हा गृहीत धरले आहे. आतापर्यंत एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक यांना नोटीस आल्या आहे. शरद पवार यांना सुद्धा ईडीने नोटीस बजावल्या आहे’ असंही राऊत म्हणाले.