बोर्डाने परीक्षा फी परत न केल्यास ‘शिक्षक भारती’ न्यायालयात जाणार – संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांचा इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

यवतमाळ : शासनाने कोरोनाच्या संकटामुळे इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. मात्र परीक्षा फी साठी घेतलेली प्रति विद्यार्थी ४१५ रुपयांची रक्कम अद्यापही बोर्डाकडेच आहे. सध्याच्या काळात ग्रामीण भागातील जनतेसाठी एकेक रुपया महत्वाचा आहे.

त्यामुळे बोर्डाने परीक्षा फी ची सुमारे १ कोटी ५८ लाख रुपयांची रक्कम तातडीने परत करावी अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांनी केली आहे. याबाबत लवकर निर्णय न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी ची रक्कम १ कोटी ५८ लाख आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची एकूण परीक्षा फी किती असेल व ते पैसे बोर्डाने का अडवून ठेवले आहे असे प्रश्न विद्यार्थी व पालक विचारात आहेत.

लॉकडाऊन मुळे यावर्षी शाळा अत्यल्प काळासाठी भरल्या. विद्यार्थ्यांनी जीवाचा आटापिटा करून शक्य त्या माध्यमातून अभ्यास केला व परीक्षेची तयारी केली. बोर्डाने परीक्षा फॉर्म व परीक्षा फी देखील घेतल्याने आता परीक्षा होणार अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. मात्र ऐन परीक्षा तोंडावर असतांना ती रद्द करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा हिरमोड झाला. तसेच पुढचे प्रवेश कसे होणार, गुणांकन कशा पद्धतीने केले जाणार या बाबी सुद्धा अद्याप बोर्ड व राज्य सरकारने स्पष्ट केलेल्या नाहीत. त्यामुळे समस्त शिक्षण क्षेत्रात संभ्रम पसरला आहे.

 

विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत करा

गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी चे कोट्यवधी रुपये बोर्डाकडे अडकून पडले आहे. ज्या प्रक्रियेसाठी शुल्क आकारल्या जाते ती होणारच नसल्याने बोर्डाला ते पैसे जवळ ठेऊन घेण्याचा कोणताही अधिकार नाही. या पैशांवर आलेले आजवरचे व्याज बोर्डाने जवळ ठेवावे मात्र विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत करावी.

साहेबराव पवार – जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना

lead storySahebrao PawarYawatmal