लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, : जिल्ह्यात दारुबंदीची अंमलबजावणी अधिक कडक करत अवैध दारू व्यवसायावर निर्णायक घाव घालण्याच्या दिशेने गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली. अहेरी उपविभागातील विविध पोलिस ठाण्यांत नोंद असलेल्या प्रकरणांमधील तब्बल १० लाखाहून अधिक किमतीचा जप्त दारूसाठा एकाच दिवशी नष्ट करण्यात आला. या कारवाईने अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे.
अहेरी, पेरिमिली, वेंकटापूर आणि राजाराम परिसरातील एकूण १५९ गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल दीर्घकाळ साठवून ठेवण्यात आला होता. मात्र हा साठा नाशवंत स्वरूपाचा असल्याने आणि नव्याने सुरू असलेल्या कारवायांमुळे साठवणुकीचा प्रश्न गंभीर होत असल्याने न्यायालयीन परवानगी घेऊन २ एप्रिल रोजी त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा तयार करून जप्त केलेल्या दारूच्या काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या रोड रोलरने चिरडण्यात आल्या. त्यानंतर हा चुरा खड्ड्यात टाकून पुन्हा जागा समतल करण्यात आली. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली.
या कारवाईमुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलिसांचा कठोर दृष्टिकोन अधोरेखित झाला आहे. दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात कायद्याचे उल्लंघन करून दारूची वाहतूक व साठवण करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अहेरी पोलिसांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. स्थानिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही मोहीम राबवण्यात आली.