सांगली जिल्ह्यात तातडीने आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन – पालकमंत्री जयंत पाटील यांची घोषणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सांगली, दि. ४ मे: सांगली जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेऊन ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.जलसंपदा व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. ५ मे मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

सोमवारी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ५६८ वर पोहोचली असून ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट करत, प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात ५ मे रोजी मध्यरात्रीपासून ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

सांगली जिल्ह्याला ऑक्सिजन जेमतेम मिळतंय, प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावे लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत म्हणून कोरोनाची वाढती शृंखला मोडण्यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे होते. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे.त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती जयंत पाटील यांनी केली आहे.

jayant Patil