राज्याचे गृहमंत्री झाले वधुपिता तर नागपूरचे जिल्हाधिकारी झाले वरपिता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

डेस्क डिसेंबर

नागपूर डेस्क डिसेंबर:- मतीमंद व मुकबधीर अनाथ मुलांच्या संगोपनासोबतच पुनर्वसनासाठी नि:स्पुर्हपणे कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवी शंकरबाबा पापडकर यांची मानस कन्या कु. वर्षा शंकरबाबा पापडकर व अनाथालय बालगृहातील समीर यांचा विवाह रविवार, दिनांक 20 डिसेंबर रोजी नागपूर येथे साजरा होत आहे. या विवाहात कु. वर्षा हिचे कन्यादान वधुपिता म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख व सौ. आरती देशमुख करणार आहेत. मुकबधीर असलेल्या समीर याच्या वरपित्याची जबाबदारी नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व सौ. ज्योत्सना ठाकरे यांनी स्वीकारली आहे. रविंद्र ठाकरे व सौ. ज्योत्सना ठाकरे यांनी आज समीर व वर्षा यांना विशेष निमंत्रित करुन वर व वधु यांचे वरपिता म्हणून औक्षण करुन लग्नसोहळयाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली.

तसेच अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सौ. रिध्दी देशमुख यांनी नव वरवधुंचे स्वागत केले. अमरावती जिल्हयातील वझ्झर येथे स्वर्गीय अंबादासपंथ वैद्य मतीमंदी, मुकबधीर अनाथालय येथे 23 वर्षापूर्वी नागपूर रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत पोलीसांना सापडलेल्या मुलीचे संगोपन करुन चिमुकलीचा तिचा आईवडीलाप्रमाणे सांभाळ करुन तिला वडीलाचे नाव दिले. ती सहा वर्षाची झाल्यानंतर शिक्षणाकरीता संत गाडगेबाबा निवासी मुकबधीर विद्यालय येथे चौथीपर्यंत शिक्षण देवून स्वता:च्या पायावर उभे केले.

हे पण वाचा:-कोरोनामुळे संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द.

डोंबीवली येथे बेवारस स्थितीत सापडलेल्या दोन वर्षाच्या समीरचे सुध्दा वझ्झर येथील अनाथालयात शंकरबाबा पापडकरांनी स्वता:चे नाव देवून सांभाळ केला. सातव्या वर्गापर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी नोकरी मिळवून दिली. बालगृहातील कु. वर्षा सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर शंकरबाबांनी स्वतंत्र घर तसेच पुढील पुनर्वसनाच्या दृष्टीनेसुध्दा स्वावलंबी केले. त्यानंतरच दोघांच्या विवाहाला समंती दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बालगृहाला भेट दिली असता दोघांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवून समंती मिळाल्यानंतर कन्यादान करण्याचे त्यांनी मान्य केले. चि. समीर व कु. वर्षा या मुकबधीर अनाथ यांचा विवाह येत्या 20 डिसेंबर रोजी नागपूर येथे साजरा होत आहे. सामाजिक दायित्व स्वीकारुन रविंद्र ठाकरे यांनी वरपित्याची जबाबदारी स्वीकारली. दिव्यांगाच्या पुनर्वसनासाठी कायम पर्यत्नशील असलेल्या शंकरबाबा पापडकर यांच्या मानस कन्या व मानस पुत्र यांचा विवाह सोहळा एक राष्ट्रीय महोत्सव म्हणून साजरा व्हावा तसेच दिव्यांगाच्या पुनर्वसनाबद्दल सामाजिक बांधिलकी वृध्दीगंत व्हावी, अशी रविंद्र ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.