आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारने विश्वासात न घेतल्याने सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय

अधिवेशन सुरू असल्याने शासनाने आपली भूमिका सभागृहात स्पष्ट करावी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 9 जुलै –राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात मुंबईत अधिवेशन कालावधीत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आंदोलनाला भेट देऊन काय चर्चा केली आहे हे राज्यातील जनतेला कळले पाहिजे. या प्रकरणी राज्य सरकारने विरोधकांना विश्वासात न घेतल्याने महाविकास आघाडी आज बैठकीला जाणार नाही. राज्य शासनाने आरक्षणप्रश्नी त्यांची भूमिका सभागृहात स्पष्ट करावी अशी मागणी विधासभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात केली..

वडेट्टीवार म्हणाले, राज्यात आरक्षण प्रश्नावर आंदोलन सुरू असताना आंदोलकांसोबत केलेली चर्चा,दिलेले आश्वासन शासनाने सभागृहात मांडावे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नेमकी काय चर्चा झाली होती,ती राज्यातील जनतेला कळली पाहिजे.आरक्षण प्रश्नी शासनाने दोन्ही समाजाचे समाधान होईल असा तोडगा काढावा,सरकारने न्याय देण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे.