लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरात नवरात्री उत्सवात भक्तिभावासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम पार पडला. श्री फाउंडेशनच्या वतीने “भक्ती हिच खरी शक्ती” या संकल्पनेतून नवरात्राच्या नऊ दिवसांत शहरातील विविध मंडळांतर्फे जमा झालेल्या फुलांचा पर्यावरणपूरक उपयोग करण्यात आला. युवा गर्जना मंडळ अयोध्या नगर, कारगिल चौक दुर्गा मंडळ, शारदा देवी मंडळ मथुरानगर, अल्हादनगर, कलेक्टर कॉलनी व सोनापूर कॉम्प्लेक्स या मंडळांच्या सहयोगाने जमा झालेली फुलं विशेषरित्या तयार करण्यात आलेल्या खडयात टाकण्यात आली. AR ट्रेडिंग कंपनीने JCB उपलब्ध करून दिल्याने ही संकल्पना प्रत्यक्षात आणता आली.
या उपक्रमात लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्था एकत्र येऊन नवरात्राच्या भक्तीला सामाजिक जबाबदारीची जोड दिली. फुलांच्या योग्य व्यवस्थापनामुळे नदी-नाल्यांवर होणारे प्रदूषण टळले तसेच भक्तीला “निसर्गमित्र” दिशा मिळाली. या प्रसंगी गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी नवरात्रासारख्या धार्मिक सणांतून पर्यावरणपूरकतेचे बीज रुजवल्याबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
श्री फाउंडेशनच्या अध्यक्षा पायल श्रीकांत कोडापे, उपाध्यक्षा भाग्यश्री गड्डमवार, तसेच संस्थेतील कार्यकर्त्यांमध्ये मंजू कोडापे, मिथिला धांडे, शरयू चौके, संध्या पवार, वंदू निगम, सोनाक्षी अवसरे, वैशाली मुंनघाटे, स्वाती करपे, वासंती कांबळे, आशिष रोहणकर, आशिष कोडापे, सागर हजारे आणि अन्य सदस्य सक्रियतेने सहभागी झाले.