जळगाव दि ०३ जानेवारी : पाळधी गावातील आरती भोसले आणि प्रशांत पाटील यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. दोघेही काही दिवस बेपत्ता होते. त्यानंतर हे दोघे लग्न करुन परतले. त्यावेळी निर्माण झालेला वाद दोघांच्याही पालकांनी विवाहाला मान्यता देऊन मिटवला होता. प्रेमविवाह करुन सासरी गेलेल्या तरुणीचा दुसऱ्या दिवशीच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी धरणगाव तालुक्यातील पाळधीमध्ये घडली होती. या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच त्या तरुणीच्या पतीचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रशांत पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे.
पाळधी गावातील या प्रकारानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मयत आरतीचे सासरे विजयसिंग पाटील, मृत प्रशांतचे मित्र विकास धर्मा कोळी, विक्की उर्फ विजय संतोष कोळी या तिघांना शनिवारी अटक केली आहे. मात्र, सासरी गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरतीचा संशयास्पद मृत्यू झाला. तिची हत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला. मात्र, विषबाधा झाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. आरतीचा मृत्यू झाला त्याच दिवशी पती प्रशांतनेही विषारी औषध घेतलं. त्यामुळे त्याचीही प्रकृती खालावली. त्याला जळगाव इथं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आरती आणि प्रशांत यांनी दत्त जयंती दिवशी मंदिरात जाऊन विवाह केला होता. विवाहानंतर अवघ्या 3-4 दिवसातच आरतीचा मृत्यू झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रशांतनेही मृत्यू जवळ केला. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. पुढील तपासातून काय झाले हे स्पष्ट होईल.