पोलीस भरतीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने घेतला आंदोलनाचा पवित्रा; गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी घंटानाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क, दि. १० जानेवारी : गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार जाहिरातही प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया खोळंबली.

त्यानंतर सरकारने जानेवारी महिन्यात पोलीस भरतीचा पुन्हा आदेश काढला. यामध्ये राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला. त्यांनतर गृहविभागाचा पोलीस भरतीचा जीआर चुकीचा आहे. ही पोलीस भरती तातडीने थांबवण्याची मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली होती. या सर्व गोष्टींमुळे आता राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक झाला आहे. महासंघाने भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्याची मागणी केली आहे.

मागील तीन वर्षांपासून राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया प्रलंबित आहे. भरतीची घोषणा करुन राज्य सरकार भरतीला वारंवार स्थगिती देत आहे, असा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केला. तसेच, पोलीस भरती लवकरात लवकर घेण्याची मागणी करत महासंघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी महासंघाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरासमोर जमा होऊन घंटानाद आदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. हे आंदोलन सोमवारी (11 जानेवारी) केले जाईल. यावेळी ओबीसी समाजाचे तसेच पोलीस भरतीसाठी कित्येक वर्षांपासून तयारी करणारे तरुणही उपस्थित असतील.

गृहमंत्री अनिल देशमुख