विधानसभा निवडणुकीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस जवानांना मिळाला सव्वादोन कोटी रुपयांचा भत्ता

मतमोजणी नंतरच्या तीन दिवसांत रक्कम खात्यात जमा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

 गडचिरोली : दि. ०३:  विधानसभा निवडणुकीत गडचिरोली या नक्षल प्रभावित व अतिदुर्गम जिल्हयात  निवडणूक कालावधीत कर्तव्य बजावणाऱ्या १६ हजार जवानांना मतमोजणी प्रक्रियेनंतर तिसऱ्याच दिवशी भत्त्याची रक्कम अदा करण्यात आली. एवढ्या जलदगतीने भत्ता देणारा गडचिरोली हा राज्यातील  एकमेव जिल्हा ठरला आहे.

ही निवडणूक यशस्वीपणे पार पडण्यासाठी  १११ कंपन्या तसेच नागपूर शहर, महाराष्ट्र पोलिस अकादमीतील प्रशिक्षण सुरु असलेले नाशिक व पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर अशा विविध ठिकाणांहून एकूण ५०० पोलिस उपनिरीक्षक व अंमलदार व स्थानिक ७०० च्या वर गृहरक्षक दलाच्या सुरक्षा जवानांसह एकूण १६,००० च्या वर सुरक्षा जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला सुरक्षा जवानांच्या भत्त्यापोटी प्रशासनाला सुमारे सव्वादोन कोटी रुपये मोजावे लागले.

सुरक्षा दलातील शेवटची टीम १ डिसेंबरला परतली. त्यानंतर सर्व जवानांना सुरक्षितपणे आपापल्या ठिकाणी परत पाठविण्यात आले. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.  इतर जिल्ह्यांमध्ये निवडणुकीनंतर सहा-सहा महिने उलटूनही सुरक्षा कर्तव्याचा भत्ता मिळत नसल्याची ओरड असताना निवडणूक कालावधीत  जवानांनी केलेल्या खडतर सेवेनंतर प्रशासनाने आपली तत्परता दाखवत त्या सर्वांना तिसऱ्याच दिवशी भत्ता अदा केला. त्याकरिता  पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पाठपुरावा केला. ३६७ अतिसंवेदनशील केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र दलाचे जवान निवडणूक  बंदोबस्ताकरिता तैनात संपूर्ण सुरक्षा जवानांना निवडणुकीच्या अनुषंगाने उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आलेले होते. जिल्ह्यातील ३६७ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात करण्यात आलेले असून, सी- ६०सीआरपीएफ शीघ्र कृती दल, विशेष कृती दल पथकाच्या ३६ तुकड्यांमार्फत जिल्ह्यातील अतिसंवेदनशील जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबविण्यात आले. त्यामुळे कोठेही अनुचित घटना घडली नाही.

निवडणूक बंदोबस्ता करिता  छत्तीसगड, तेलंगणातील पोलिसांचीही मदत घेण्यात आली. छत्तीसगड व तेलंगणातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी शिरकाव करत असतात. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत कुठलीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी छत्तीसगड व तेलंगणा सीमावर्ती भागात नक्षलविरोधी अभियान गतिमान केले होते. शिवाय दोन्ही राज्यांतील पोलिसांना विनंती करुन तेथेही महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात नक्षल्यांच्या हालचालींवर तेथील जवान लक्ष ठेवून होते. या नक्षलविरोधी मोहिमेचाही चांगला फायदा झाला. गडचिरोलीच्या प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेची सर्वत्र चर्चा आहे.